श्रावण मासात श्री सिद्धरामेश्वरांच्या वचनांचा जागर; सोशल मीडियाचा तरुणाईकडून विधायक वापर 

Siddheshwar Mandir
Siddheshwar Mandir

सोलापूर : श्रावण मासानिमित्त शहरवासीय दररोज श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी जातात. काहीजण तर सकाळ व संध्याकाळच्या दोन्ही वेळेस आरतीला उपस्थित राहात असतात. मात्र सध्या मंदिर बंद असल्यामुळे अनेक वर्षांची अनेक जणांची परंपरा खंडित झाली आहे. त्याकरिता मंदिर समितीने फेसबुक लाइव्हद्वारे भाविकांना घरबसल्या दर्शन घेण्याची व पूजा पाहण्याची सोय केली आहे. हे होत असताना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या विचारांची, उपदेशांची व त्यांच्या कार्याची ओळख समाजाला व्हावी यासाठी तरुणाई झटत आहे. त्यापैकीच एक बसवराज बिराजदार. तो गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण श्रावण महिनाभर दररोज एक विचार (वचन) व त्याचा अर्थ याची एक पोस्ट बनवून सोशल मीडियावर प्रसारित करून श्री सिद्धरामेश्वरांच्या वचनांचा जागर करत आहे. 

श्रावण महिना भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि धार्मिक असा महिना समजला जातो. या महिन्यात अनेक महत्त्वाचे सण-उत्सव असतात. अत्यंत धार्मिक वातावरणात हे सर्व सण आनंदाने साजरे केले जातात. परंतु सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचे जीवघेणे संकट आल्याने या आनंदावर विरजण पडले आहे. अशा वेळी श्री. बिराजदार हे मराठी भाषेमधील वचनांचा अतिशय सोप्या शब्दांत अर्थ स्पष्ट करून सुंदर प्रकारे डिझाईन करून व्हॉट्‌सऍप, फेसबुक वॉलवर वाचकांसाठी पोस्ट करत आहेत. यासाठी स्वस्तिक ग्राफिक्‍सचे आर्टिस्ट बालाजी शेराल हे मोफत सहकार्य करीत आहेत. सध्या सोशल मीडियाचा गैरवापर होत असताना त्याचा विधायक कार्यासाठीही वापर करता येतो, याचे उदाहरण बसवराज यांनी समाजासमोर ठेवले आहे. 

मुळात ही संकल्पनाच अतिशय सुंदर आहे. श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन भूमीमध्ये श्रावण मासानिमित्त त्यांच्या वचनांचे तसेच विचारांचे वाचन, मनन व्हावे, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी या हेतूने फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवरच्या मित्रांनी ते वाचून त्यांचा आदर्श घ्यावा, या विधायक उद्देशाने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. हा उपक्रम ते गेल्या तीन वर्षांपासून राबवत आहेत, हे विशेष. बिराजदार यांनी महात्मा बसवेश्वरांची वचने देखील संकलित केलेली आहेत. संत विचारांचा जागर करण्याबरोबरच बसवराज त्यांच्या मित्रमंडळींना सोबत घेऊन पर्यावरण रक्षणाचे देखील कार्य करत आहेत. गेल्या वर्षी स्वतःच्या शेतात 1500 रोपांची निर्मिती केली. ती रोपे मागेल त्यांना वृक्षलागवडीसाठी मोफत वाटप केली. 2016 मध्ये महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर असलेलले कळसूबाई येथे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांची प्रतिमा भेट दिली आहे. वीरशैव व्हीजन या सामाजिक संस्थेच्या प्रसिद्धीप्रमुखपदी तो कार्यरत आहे. व्हीजनच्या माध्यमातून समाजातील गरीब, गरजू विद्यार्थी व नागरिकांना मदत करण्याबरोबरच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडात्मक उपक्रमामध्ये सहभागी असतो. 

या उपक्रमाबद्दल श्री. बिराजदार म्हणतात, श्री सिद्धरामेश्वरांनी 68 हजार वचने लिहिली आहेत. त्यापैकी काही वचने उपलब्ध आहेत. जीवनात कसं जगावं, समाजापुढे आदर्श कसा उभा करावा, याचा संदेश त्यांनी त्यांच्या वचनांतून दिला आहे. याची माहिती युवा पिढीला व्हावी याकरिता आणि मला जी माहिती आहे ते दुसऱ्याला द्यावे या हेतूने मी हा प्रपंच करीत आहे. 

वीरशैव व्हीजनचे अध्यक्ष राजशेखर बुरकुले म्हणाले, आधुनिक युगात तरुणाई पाश्‍चात्य संस्कृतीकडे वळत आहे. अशा परिस्थितीत ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या विचारांचा जागर करणे व त्यांच्या कार्याची ओळख समाजाला करून देणे हे कार्य आदर्शवत असे आहे. यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूरच्या विकासास मदत होईल. संपादन :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com