जैवविविधतेमुळे उभयचर, सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व टिकून 

2Biodiversity_1280x720_0.jpg
2Biodiversity_1280x720_0.jpg

सोलापूर :  जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधता टिकवण्यासाठी व निर्माण झालेले धोके समजून घेण्यासाठी हिरवाईच्या चळवळीतील विविध संघटनांना एकवटण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात प्राण्यांच्या वृद्धीसाठी ही चळवळ उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेवर उभयचर, व सरपटणाऱ्या प्राण्यांचे अस्तित्व टिकवून असल्याचे स्पष्ट होत आहे. 

सोलापूर जिल्हा जैवविविधतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती नानाविध जैवविविधतेला पोषक आहे. जिल्ह्यातून वाहणारे नदी-नाले व जलाशय विपुल असल्यामुळे जलसाठा चांगला आहे. बागायत जमिनी, फळबागा, गवताळ माळराने मोठ्या प्रमाणात आहेत. जलसाठा चांगला असल्यामुळे अन्नसाखळीतील प्राथमिक उतपादकजीव असलेले शैवाल, प्लवंग मासे, संधिपाद प्राणी (खेकडे कोळी इत्यादी), मृदुकाय प्राणी (गोगलगायी, शिंपले इत्यादी) विपुल प्रमाणात आढळतात. जिल्ह्यात उभयचर व सरपटणारे प्राणी त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. अनेक प्रकारचे पक्षी, स्थलांतरित पक्षी यांचे वैविध्य मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळते. याशिवाय ससे, कोल्हे, लांडगे, मुंगूस, हरिण, उदमांजर, जंगलीमांजर या वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे. दुर्मिळ होत चाललेले साळींदर, खवले मांजर आदी प्राणी नदी व ओढ्याच्या काठावरच्या गचपणीत आणि जिल्ह्यातील काही डोंगरटेकड्यांच्या कपारीत अस्तित्व टिकवून आहेत. माळढोक व फ्लेमिंगोसारख्या पक्ष्यांचे कमी झालेले प्रमाण या घटना धोक्‍याच्या सूचना देत आहेत. 

संभाव्य उपाययोजना 
- नैसर्गिक अधिवासात मानवी हस्तक्षेप थांबावा 
- जलसाठ्यांना कायम पाणी राहण्यासाठी धोरण 
- जलसाठ्याच्या परिसरापासून मानवी वस्ती दूर ठेवणे गरजेचे 
- पक्षी व प्राण्यांच्या शिकारी थांबवणे 
- गवताला लागणाऱ्या आगी टाळण्यासाठी उपाय 
- नियोजनबध्द वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणे 
- वृक्षतोडीला आवर घालण्याची गरज 

  • हिप्परगा तलाव समस्या सोडवण्याचे आव्हान 
  • हिप्परगा तलावातील पाणीसाठा विस्कळित झाल्याने तेथील वनस्पतीचे प्रकार बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच पद्धतीने सर्व जैवविविधता क्षेत्राच्या संसाधनाच्या बाबत अशा बदलांचा अभ्यास करुन त्यावर उपाय काढणे हे अभ्यासकांसाठी आव्हान बनले आहे. 

आकडे बोलतात... 

फुलपाखरांच्या प्रजाती  80 

देशी व विदेशी पक्षी  250 

वनस्पती  1,300 

याबद्दल निसर्ग अभ्यासक अरविंद कुंभार यांन सांगितले की, जिल्ह्यात वन्यप्राणी व पक्ष्यांची शिकार होत असल्याची घटना वारंवार घडताना आढळतात. या शिकाऱ्यांवर अंकुश बसवण्यासाठी वनविभाग तत्परता दाखवायला पाहिजे. जिल्ह्यातील जलस्थाने प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहेत का? जलप्रदूषण होऊ नये, म्हणून उपाययोजना आखल्या पाहिजेत. वाळू उपशावर पूर्णपणे बंदी घालण्याची गरज आहे. 


पर्यावरणप्रेमी राजकूमार कोळी यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनेक प्रकारच्या निसर्गप्रेमी संघटना अनेक प्रकारचे उद्देश ठेवून निसर्गाच्यासाठी त्यांचे योगदान देत असतात. मात्र जैवविविधता टिकवण्यासाठी एकच व्यासपीठ निर्माण व्हायला हवे. तरच या कामाला दिशा मिळू शकेल. 


एनसीसीएस संतोष धाकपाडे यांनी सांगितले की, माळरानावर भटकी कुत्री व मेंढपाळांच्या कुत्र्याकडून होणाऱ्या शिकारी थांबल्या पाहिजेत. जिल्ह्यातील सर्व पाणवठ्यावर वर्षभर पाणी असावे, याचे नियोजन वन विभागाकडून व्हावे. 

संपादन : अरविंद मोटे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com