"कृषी कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा; मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकावण्याचे काम सुरू !' 

subhash_deshmukh
subhash_deshmukh

कुसूर (सोलापूर) : वडापूर बॅरेज व मंद्रूपच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला असता तर सिंचनाचे प्रमाण वाढले असते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली असती व युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र, शासनाच्या नाकर्तेपणामुळे वडापूर बॅरेज व मंद्रूपच्या एमआयडीसीच्या भूसंपादनास विलंब होत आहे. केंद्र सरकार राबवीत असलेल्या योजना या शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकाविण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. भाजपने शेतकऱ्यांविषयी खोटी तळमळ दाखवली नाही आणि दाखवणारही नाही. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. त्यामुळे शेतकरी आपला कोणताही माल कुठेही विकू शकणार आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. 

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी तेरामैल येथील कृष्णा पॅलेस सांस्कृतिक भवन येथे भाजपकडून "शेतकरी शिवार संसद' कार्यक्रम घेण्यात आला, त्या वेळी आमदार देशमुख बोलत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. या वेळी कार्यालयात मोठ्या स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी बांधवांना उद्देशून केलेले भाषण सर्वांना दाखवण्यात आले. 

आमदार देशमुख पुढे म्हणाले, आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आले त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा कृषी कायदा पंतप्रधानांनी काढला. हमीभाव, करार, कंत्राटी शेती, शेती करार अशा अनेक बाबींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यात सुलभता आणून शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे होणारे नुकसान रोखले जावे हा एकच उद्देश ठेवून हा कायदा करण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना भडकाविण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नवा कृषी कायद्या व अन्य बाबींची माहिती घ्यावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण आणि भाजप कायम कटिबद्ध राहणार आहे. 

शेतकरी मेळाव्याला दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, एम. डी. कमठे, सचिन पाटील, संगप्पा केरके, गौरीशंकर मेंडगुदले, अनिल नांगरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com