शिवराज्याभिषेकामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात नवीन पर्वाची सुरवात (VIDEO)

शिवराज्याभिषेकामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात नवीन पर्वाची सुरवात (VIDEO)

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकामुळे हिंदुस्थानच्या इतिहासात एक नवीन पर्वाची सुरवात झाली. शिवराज्याभिषेक म्हणजे अपूर्व सोहळा होता, असे इतिहासाच्या अभ्यासिका प्रा. लक्ष्मी रेड्डी यांनी सांगितले. 


आज शनिवारी शिवराज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्त प्रा. रेड्डी यांनी शिवराज्याभिषेकाचे महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, ""शिवचरित्रातील आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील एक अत्यंत गौरवशाली आणि वैभवशाली घटना म्हणजे शिवराज्याभिषेक. 350 वर्षे इस्लामच्या पारतंत्र्यात खितपत असलेल्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्‍वरासमोर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे कार्य सहज सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना मोगल, आदिलशाही, निजामशाही या इस्लामी सत्तासोबतच सिद्दी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांशीही दोन हात करावे लागले. अठरापगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करून त्यांना स्वराज्याच्या कार्यास जुंपले. जावळीचे चंद्रराव मोरे, अफजलखानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्तेखानाचे प्रकरण, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका अशा अनेक बाक्‍या प्रसंगांना सामोरे जात त्यांनी स्वराज्य स्थापन केले.'' 


""स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य किल्ले बांधले, लष्कर उभारले, जमीन महसूल, न्यायव्यवस्था चोख ठेवली, आरमार निर्माण केले. तरीही शत्रू त्यांना स्वतंत्र राजा मानावयास तयार नव्हते. आपण एक स्वतंत्र, सार्वभौम राज्य स्थापन केल्याचे साऱ्या जगाला समजावे म्हणून राज्याभिषेक करणे अपरिहार्य होते. स्वराज ही शिवाजी महाराजांची स्वनिर्मिती असली तरीही त्यास राजमान्यता मिळविण्याचे सोपस्कार करणं अगत्याचे होतं. आपल्या राजाला राज्याभिषेक झाला पाहिजे हा सार्वजनिक भावनेचा आदर गागाभट्टासारख्या धर्म पंडिताने उचलून धरला आणि महाराष्ट्र राज्याभिषेकाच्या तयारीला लागला,'' असेही प्रा. रेड्डी म्हणाल्या. 

 
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवरायांनी "राज्याभिषेक शक' ही नवी कालगणना सुरू करून ते शककर्ते बनले. शिवराई आणि होन ही नवी नाणी चलनात आणली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी "लेखनप्रशस्ती' आणि "राज्यव्यवहरकोश" हे ग्रंथ लिहून घेतले. राज्याभिषेकामुळे शत्रूंवर वचक निर्माण झाला. मराठ्यांचा राजा छत्रपती बनला, ही गोष्ट काही सामान्य नव्हती. 
- प्रा. लक्ष्मी रेड्डी, दयानंद महाविद्यालय, सोलापूर 

हिंदुस्थानच्या इतिहासात नवीन पर्वाची सुरवात (VIDEO)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com