तीन पक्ष एकत्रित म्हणून गाफील नका राहू : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

JAYANT PATIL1.JPG
JAYANT PATIL1.JPG

सोलापूर: विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधरच्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्रित आहेत म्हणजे आपला विजय नक्की आहे असे म्हणून गाफील राहू नका. पुणे शिक्षक मतदार संघात मला राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा पाठींबा असल्याचे काही जण सांगत आहेत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, शिक्षकमधील आपले महाविकास आघाडीचे उमेदवार हे जयंत आसगावकरच असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज दिली. 

पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज सोलापुरातील हेरिटेज लॉन्समध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, कॉंग्रेसचे राज्यमंत्री सतेज पाटील, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिपक साळुंखे, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार रामहरी रुपनवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, संभाजी शिंदे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, सोलापूर शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, उत्तम जानकर कॉंग्रेसचे महापालिका गटनेते चेतन नरोटे, महापालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कोरोनामध्ये आम्ही कधीही राजकारण केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले टाळ्या वाजवा, आम्ही टाळ्या वाजविल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले दिवे लावा, आम्ही दिवे लावले. कोरोनाचे संकट संपण्यापूर्वीच भाजपने मात्र मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण केले. महाविकास आघाडी सरकारने कोरोनात चांगले प्रशासकीय काम केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री भरणे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी मनोगत व्यक्त केले. 

भाजपला दणका द्यावा 
गेल्या वेळी या मतदारसंघातून भाजपचे चंद्रकांतदादा पाटील आठव्या फेरीत विजयी झाले आणि त्यांना आमदारकीची लॉटरी लागली. या निवडणुकीच्या माध्यमातून सोलापूरच्या जनतेने भाजपला सोलापुरी दणका द्यावा. 
- सतेज पाटील, राज्यमंत्री 

मतभेद व मनभेद दूर होतील 
आपल्यात मतभेद, मनभेद असतील तर ते निश्‍चितपणे दूर केले जातील. परंतु या मतभेदाचा आणि मनभेदाचा परिणाम निवडणुकीवर होता कामा नये. भाजप ज्या मग्रुरीने काम करत आहे. ही मग्रुरी उतरविणे आणि भाजपला हद्दपार करणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे. 
- उदय सामंत, उच्च शिक्षण मंत्री 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com