पंढरपूर तालुक्‍यातील साखर कारखानदारांच्या विरोधात "जनहित'चा एल्गार ! धरणे आंदोलनाचा सातवा दिवस 

Janhit Agitation
Janhit Agitation

पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील श्री विठ्ठल, सहकार शिरोमणी आणि सीताराम महाराज या तिन्ही साखर कारखान्यांकडे मागील दोन वर्षांपूर्वीच्या गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. एफआरपीची थकीत रक्कम मिळावी, कामगारांचे थकीत वेतन आणि ऊस वाहतूकदारांचे कमिशन डिपॉझिट तातडीने द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. 

गेल्या सात दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेने येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी घेतली आहे. दरम्यान, साखर कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली आहे. त्यानंतर जनहितचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखान्याने मागील (2018-19) गाळप हंगामामध्ये गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. गुरसाळे येथील विठ्ठल आणि भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे या दोन्ही साखर कारखान्यांनी (2018-19) एफआरपीची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीबरोबरच कामगारांचे वेतन देखील दिले नाही. ऊस वाहतूक ठेकेदारांनाही साखर कारखानदारांनी ठेंगा दाखवला आहे. 

थकीत रक्कम द्यावी, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेने चार दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. परंतु अद्याप साखर कारखानदारांना घाम फुटला नाही. आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान, या आंदोलनाला बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनीही पाठिंबा दिला आहे. साखर कारखानदारांनी तातडीने थकीत एफआरपीची रक्कम द्यावी; अन्यथा यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे. 

दरम्यान, थकीत एफआरपीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. परंतु या बैठकीत समन्याय तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. या बैठकीनंतर शेतकरी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com