पुन्हा लॉकडाउनमुळे रोजीरोटीचा प्रश्‍न; मात्र कोरोनाला रोखणेही महत्त्वाचे! काय म्हणतात कामगार व उद्योजक? वाचा 

Lockdown
Lockdown

सोलापूर : शहरातील यंत्रमाग, गारमेंट व विडी उद्योग यासह विविध उद्योग-व्यवसायांना कोरोनाने नामोहरम करून सोडले आहे. आधीच बेरोजगारीमुळे पुणे-मुंबई अशा मोठ्या शहरांत तरुणाईचे स्थलांतर होत आहे. जे कामगार शहरात आहेत, ते जे उद्योग सुरू आहेत त्यात कमी पगारात मात्र कुटुंब चालेल इतका रोजगार मिळवत होते. मात्र कोरोना विषाणूने शहरात प्रवेश केला तसा लॉकडाउनमुळे या श्रमिक वर्गाचा जवळपास अडीच महिने रोजगार हिरावून घेतला. जून महिन्यात लॉकडाउन शिथिल झाले अन्‌ कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला. मात्र आता पुन्हा दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनचा निर्णय झाल्यामुळे कामगार व उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महापालिका हद्दीत व शेजारच्या गावांमध्ये गुरुवारपासून (ता. 16) दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला आहे. आता पुन्हा लॉकडाउनच्या घोषणेमुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न पुन्हा एकदा ज्वलंत होऊ लागला आहे. मात्र, जिवंत राहिलो तर रोजगार पुन्हा मिळवू, त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउनची गरज आहे, असेही मत काहीजणांनी मांडले आहे. सोलापूर शहर व परिसरातील कामगार नेते, उद्योजकांनी लॉकडाउनबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया... 

लॉकडाउनविरोधात लढा उभारू 
माजी आमदार तथा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम म्हणाले, लॉकडाउन हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाय नाही. त्यासाठी आवश्‍यक ती साधने, औषधे, वैद्यकीय सुविधांचा अभाव या उणिवा भरून काढून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता शासनाचे अपयश लपवण्यासाठी जनतेला वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे. उद्योगधंदे व कष्टकरी, कामगारांच्या रोजगाराला नख लावल्यास लॉकडाउनच्या विरोधात लढा उभारला जाईल. 

कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न उद्‌भवणार 
राष्ट्रवादी कामगार सेलेचे अध्यक्ष डॉ. गोवर्धन सुंचू म्हणाले, शहरात पुन्हा लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे विडी व यंत्रमाग कामगारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कुठेतरी पंधरा दिवसांपूर्वी उद्योगधंदे सुरू झाले असताना काही प्रमाणात कामगारांना दिलासा मिळाला. परंतु पुन्हा एकदा लॉकडाउन झाल्यास सर्वच कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न उद्‌भवणार आहे. तरी सर्व बाबींचा विचार करता लॉकडाउनमध्ये विडी व यंत्रमाग कामगारांना कारखान्यात काम करण्याची मुभा द्यावी. 

कामगारांना ओळखपत्र देऊन उद्योगांना मुभा द्यावी 
सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले, आता 50 टक्‍के उद्योग सुरू आहेत. कामगारांचा काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्‍न सुटला आहे. त्यात आता लॉकडाउन झाल्यास उद्योजक व कामगारांचे नुकसान होणार आहे. लॉकडाउनमधून उद्योगांना मुभा द्यावी. कामगारांना ओळखपत्र पाहून कामावर येण्यास परवानगी मिळावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करताना उद्योग-व्यवसायांना झळ बसणार नाही याची काळजी घ्यावी. 

लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करावी 
उद्योजक सत्यनारायण गुर्रम म्हणाले, शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यूदर पाहता खूप चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. लॉकडाउनची अंमलबजावणीही कडक करावी. काही बेफिकीर लोकांमुळे लॉकडाउन लागू करावा लागत आहे. अशा लोकांवर कारवाई करताना मात्र सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची दक्षताही प्रशासनाने घ्यावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com