भाजपमुळेच टेंभू, म्हैसाळ प्रकल्प पूर्णत्वास : नितीन गडकरी

Nitin Gadkari statement that the Tembhu Mahisal project was completed only because of BJP
Nitin Gadkari statement that the Tembhu Mahisal project was completed only because of BJP

सांगोला (सोलापूर) : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सगळे सिंचन प्रकल्प बंद पडले होते. 10 वर्षे प्रकल्प बंद असल्याने सिंचन 50 टक्‍क्‍यांच्यावर जात नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री सिंचाई योजना व बळिराजा योजना या दोन योजनांची आखणी केली. पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळच्या भाजप सरकारने केले आहे. केंद्राने दोन हजार 324 कोटी रुपये दिले म्हणून टेंभू, म्हैसाळ प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हर्च्युअल रॅली दरम्यान नुकताच भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, 1995 मध्ये भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात मुख्यमंत्री मनोहर जोशी व मी बांधकाम मंत्री असताना सिंचनासाठी पैसे उपलब्ध करण्यासाठी सिंचन कार्पोरेशन योजना तयार झाली. त्यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळ निर्माण करून रोखे विक्री करून निधी उभा केला. मात्र, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात सगळे प्रकल्प बंद पडले. नितीन गडकरी म्हणाले, की प्रधानमंत्री सिंचाई योजना व बळिराजा योजना अस्तित्वात आल्या. पश्‍चिम महाराष्ट्रातील सहा मोठे प्रकल्प व सात लहान प्रकल्पांना भारत सरकारने 25 टक्के हिस्सा दिला तर 75 टक्के नाबार्डचे कर्ज दिले. 50 टक्के कामे पूर्ण झालेली अर्धवट धरणे होती. त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना व मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना केले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. जवळपास 11 हजार 651 कोटी रुपयांची प्रकल्पांची किंमत होती. केंद्र सरकारने प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून दोन हजार 324 कोटी रुपये दिले. याच पैशातून टेंभू, म्हैसाळ प्रकल्प पूर्ण झाले. पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यास वेळच्या भाजप सरकारने केले असल्याचे ते म्हणाले. 

रॅलीत गणपतराव देशमुख यांचा उल्लेख 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हर्च्युअल रॅलीदरम्यान माजी आमदार गणपतराव देशमुख यांचा आवर्जून उल्लेख केला. गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्यासाठी माजी आमदार गणपतराव देशमुख संघर्ष करत असल्याचे सांगितले. भाजप सरकारने या योजनांना निधी उपलब्ध करून दिल्याने आज हे प्रकल्प पूर्णत्वास आले असून हजारो हेक्‍टर शेती ओलिताखाली येणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com