Gram Panchayat Results : वैरागातील शेळगाव, धामणगाव ग्रामपंचायतीवर वीस वर्षांनंतर फडकला शिवसेनेचा भगवा ! 

Vairag
Vairag

वैराग (सोलापूर) : वैराग भागात तिरंगी लढतीत शेळगाव (आर) व धामणगाव (दु) या दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेळगाव (आर) ग्रामपंचायतीवर पुन्हा वीस वर्षांनंतर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वासुदेव गायकवाड, शेळगाव हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष बाबा गायकवाड यांच्या गटाला केवळ दोन जागा मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सोपल गटाचे सुरेश अडसूळ यांनी 11 पैकी सहा जागांवर विजय संपादन करत शेळगाव ग्रामपंचायत पुन्हा ताब्यात घेतली आहे. 

या निकालाकडे संपूर्ण तालुक्‍याचे लक्ष लागले होते. तिरंगी लढतीत 11 जागांसाठी 33 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. सोपल गटाचे महापरिवर्तन विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख माजी सरपंच सुरेश अडसूळ यांच्या पॅनेलने सहा जागांवर बहुमत खेचून आणले. वीस वर्षे सत्ता ताब्यात असलेले वासुदेव गायकवाड व बाबा गायकवाड या आमदार राजेंद्र राऊत यांच्या ग्रामविकास आघाडी पॅनेलचा दारूण पराभव करत सत्ता खेचून घेतली. तर सोपल गटाचे बहुजन विकास पॅनेलचे विजय अडसूळ यांचा गट तीन जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाची पार्टी ठरली आहे. या ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन करत तिरंगी लढतीत सुरेश अडसूळ यांनी शेळगाव ग्रामपंचायतीची सत्ता पुन्हा ताब्यात घेतली आहे. 

शिवसेनेची सत्ता अन्‌ सुरेश अडसूळ यांची ग्रामपंचायत ! 
बार्शी तालुक्‍यात पहिली शिवसेना ग्रामपंचायत म्हणून सुरेश अडसूळ यांनी सत्ता मिळवली होती. या वेळीही माजी मंत्री दिलीप सोपल हे शिवसेनेत असून सुरेश अडसूळही त्यांचे समर्थक आहेत. शिवसेनेच्या रूपाने पुन्हा शेळगाव ग्रामपंचायत सुरेश अडसूळ यांच्या गटाने ताब्यात घेतली आहे. ग्रामस्थांनी पुन्हा शिवसेनेची सरशी केल्याचे मतदारांनी सांगितले. 

धामणगाव (दु)मध्ये शिवसेनेची सत्ता ! 
बार्शी तालुक्‍यात प्रतिष्ठेची ठरलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तानाजी पाटील, शिवाजी पाटील यांच्या गटाने शिवसेनेची सत्ता पुन्हा ताब्यात ठेवली आहे. 11 पैकी सहा जागा मिळवत बहुमत सिद्ध केले आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या गटाचे तानाजी पाटील व शिवाजी पाटील यांच्या बोधले ममताताई विकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले. तर विरोधी गटाचे आमदार राजेंद्र राऊत गटाचे समर्थक विवेकानंद बोधले यांच्या गटास तीन जागा मिळाल्या. भाजपचे राजेंद्र मिरगणे समर्थक नानासाहेब पाटील यांच्या गटास केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. येथे तानाजी पाटील व शिवाजी पाटील या दोन बंधूंनी सत्ता पुन्हा आपल्या हाती कायम राखण्यात यश मिळवले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com