विद्यार्थ्यांना शाळांचे तर शिक्षकांना बदल्यांचे टेन्शन... पालकांना मात्र वेगळेच टेन्शन..! 

Student
Student

वाळूज (सोलापूर) : लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांना शाळा आणि परीक्षेचे तर शिक्षकांना बदल्यांचे टेन्शन असून, महाविद्यालयातील शेवटच्या वर्षातील राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांचा जीव अंतिम परीक्षा होणार की नाही? या कात्रीत अडकला आहे. तर कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू कधी होणार? याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच यावर्षी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या केल्या जाणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढला गेला आहे. त्यामुळे सर्वच घटक सध्या टेन्शनमध्ये आहेत. 

शिक्षकांच्या सुरवातीला ऑनलाइन बदल्या करणार, असे सांगण्यात आले होते. नंतर मात्र हा निर्णय बदलून बदल्या या ऑफलाइन पद्धतीने होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या बदली प्रक्रियेमध्ये मोठा घोडाबाजार होणार असल्याची चर्चा शिक्षक वर्गात होऊ लागली आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व कर्मचारी मानसिक तणावाखाली आहेत. त्यात या बदल्या झाल्या तर शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. अगोदरच कोरोनाचे टेन्शन आणि त्यात बदल्यांचे टेन्शन यामुळे शिक्षकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. 

पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता दिवसेंदिवस ढासळू लागली आहे. केंद्र सरकार परीक्षा घेण्यावर ठाम असून राज्य सरकार कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ नको म्हणून या परीक्षा रद्द करण्यावर ठाम आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या धोरणाला विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत. मार्चमध्ये अचानक लॉकडाउन झाल्यामुळे विविध शहरांमध्ये असणारे विद्यार्थी आपापल्या गावी परतले. नेमका किती दिवसांचा लॉकडाउन असेल, याचा अंदाज नसल्याने या विद्यार्थ्यांची अभ्यासाची पुस्तके ज्या ठिकाणी ते राहात होते त्या वसतिगृहात किंवा भाड्याच्या खोलीमध्ये अडकून पडली आहेत. तीन ते चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही. त्यातच परीक्षा होणार की नाही, याची चर्चा प्रसारमाध्यमांमधून आणि सोशल मीडियावर सतत होत असल्याने आणि अभ्यास झाला नसल्याने परीक्षेत काय होणार? याचा मानसिक त्रास अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना होत आहे. 

मुलांना शाळेत पाठवायचे कसे? 
प्राथमिक शाळा सुरू कधी होणार आणि अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार, या चिंतेमध्ये ग्रामीण भागासह शहरी भागातील पालक आणि विद्यार्थी आहेत. शनिवारी (ता. 18) ग्रामविकास मंत्र्यांनी राज्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होणार असे जाहीर केले आहे. मात्र कोरोनाचा ग्रामीण भागात झालेला शिरकाव आणि वाढणारा वेग लक्षात घेता पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने त्यांना शाळेत पाठवायचे कसे, असा मोठा प्रश्न पालकांच्या समोर आहे. 3 ऑगस्टपासून शाळा सुरू झाल्या तरी किती विद्यार्थी उपस्थित राहतील, याबाबत शंका आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com