लॉकडाउनमुळे उद्योजकांना 'ईपीएफ'ची चिंता

लॉकडाउनमुळे उद्योजकांना 'ईपीएफ'ची चिंता

सोलापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून अनेक उद्योग बंद आहेत. उद्योग बंद असल्याने अनेक कंपन्यांना मार्च महिन्याची कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) रक्कम एप्रिल महिन्यात भरणे शक्य नसल्याने दिल्ली येथील 'ईपीएफओ'च्या मुख्यालयातर्फे त्यांना मार्च महिन्याचा भरणा करण्यासाठी 15 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आता ही मुदत संपण्यास आठवडाभराचा अवधी असून, लॉकडाउनच्या काळात मार्च महिन्याचा पगार देताना घायकुतीला आलेले उद्योजक हा भरणा करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या क्षेत्रात सोलापूर, लातूर व उस्मानाबाद हे तीन जिल्हे येतात. या तीन जिल्ह्यातील 2200 कंपन्यांपैकी 1683 कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची फेब्रुवारी महिन्यातील प्रॉव्हिडंट फंडाची 22 कोटी 85 लाख 25 हजार 812 इतकी रक्कम भरल्याची माहिती क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत मिळाली. उर्वरित 517 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची पीएफ भरणा केली नसल्याचे समोर आले. आता लॉकडाउनमध्ये 22 मार्चपासून उद्योग बंद आहेत. तसेच संपूर्ण एप्रिल महिन्यात काही कंपन्यांमध्ये एकही दिवस काम झाले नाही. लॉकडाउनच्या काळातील पगार अदा करण्याचे शासनाचे आदेशही आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा व ईपीएफची रक्कम कशी भरायची, या विवंचनेत काही उद्योजक तर बंद काळातील पगार व ईपीएफची रक्कम भरली जाईल ना, या काळजीत कामगार सापडले आहेत.

सोलापूर क्षेत्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे आवाहन करण्यात आले होते, की लॉकडाउनमुळे ज्या कंपन्या, संस्था त्यांच्या कामगार/ कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा भविष्य निधी इलेक्ट्रॉनिक चलनाद्वारे सोलापूर येथील भविष्य निधी कार्यालयात 15 एप्रिलपर्यंत जमा करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी 15 मेपर्यंत मुदत वाढवली आहे. मात्र ज्या कंपन्या, संस्था, नियोक्ता यांनी मार्च महिन्याचे वेतन त्यांच्या कामगारांना दिले आहे, त्यांनाच हे लागू होणार आहे.

केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची संधी
ज्या कंपन्या, संस्थांमध्ये 100 पेक्षा कमी कर्मचारी आहेत आणि त्यापैकी 90 पेक्षा जास्त कामगार 15 हजारापेक्षा कमी पगार घेणारे आहेत त्या कामगारांचा 12 टक्के तसेच मालकांचा 12 टक्के अशी एकूण 24 टक्के रक्कम केंद्र शासन देणार आहे. केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी कंपन्याना, संस्थांना आता १५ मेपर्यंत वेळ मिळाला आहे. या तारखेपर्यंत मार्च महिन्याचे इलेक्ट्रॉनिक चलन भविष्य निधी कार्यालयाला जमा करावे लागणार. आता या संधीचा फायदा किती उद्योजकांनी घेतला, हे 15 मे नंतर दिसून येईल.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com