यंदाची आषाढी यात्रा संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक असेल 

gahininath maharaj
gahininath maharaj

सोलापूर : यंदाची आषढी वारी संख्यात्मकदृष्ट्या नव्हे तर गुणात्मकदृष्ट्या होईल. यात्रेतील सर्व परंपरा कायम ठेवून यंदाची आषाढी वारी होणार असल्याची माहिती पंढरपूर विठ्ठल-रुक्‍मिणी समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज "सकाळ'ला सांगितली. 

सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव जास्त आहे. अशा प्रतिकूल काळात तीर्थक्षेत्र पंढरपूरची आषाढी वारी अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. या वारीसाठी महाराष्ट्रसह अन्य राज्यांतून असंख्य भाविक येतात, असे सांगून श्री. औसेकर महाराज म्हणाले, राज्याच्या कोनाकोपऱ्यातील पालख्यांसह लाखो वारकरी आषाढी एकदाशीच्या काही दिवस आधी आपापल्या गावाकडून तीर्थक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतात. मात्र, यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर श्री ज्ञानेश्‍वर महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री निवृत्तिनाथ महाराज, श्री सोपानकाका महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज, श्री मुक्ताबाई या सात मानाच्या पालख्यांचे प्रस्थान ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. या पालख्या दशमीच्या दिवशी वाखरीत दाखल होणार आहेत. या पालख्या कशा येणार याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल. 

श्री. औसेकर महाराज म्हणाले, कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाउन सुरू असल्याने तीर्थक्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर बंद आहे. आषाढी एकादशी दिवशी लॉकडाउन असेल तर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एकादशी दिवशी मानाचा नैवेद्य व धार्मिक विधी करणाऱ्या मानकऱ्यांना मंदिरात सोडण्यात येणार आहे. त्यावेळी लॉकडाउनची स्थिती कशी असेल त्यावर किती मानकऱ्यांना सोडयाचे याचा विचार होईल. त्याबाबत अगामी काही दिवसांत मंदिर समितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. 

आषाढी वारीच्या वेळेस मंदिर दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येईल, असे स्पष्ट करून श्री. औसेकर महाराज म्हणाले, श्री विठ्ठल-रुक्‍मिणीचे दर्शन हे त्याच्या पायावर माथा ठेवून वारकरी घेत असतात, मात्र यंदा कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पाहता यात काय व कसा बदल करावा याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. आषाढी एकादशी दिवशी शासनाची पूजा असते. शासनाचा प्रतिनिधी म्हणून दरवर्षी मुख्यंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्‍मिणीची पूजा होत असते. यंदा श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यंत्र्यांना पूजेचे निमंत्रण पत्र पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोपाळाकालाचा देखील कार्यक्रम होणार आहे. मंदिर समितीच्या वतीने यंदाच्या यात्रेत सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे आणि जे काही शासनाचे नियम, अटी असतील त्याचे पालन करून आषाढी वारी होणार आहे. त्याचबरोबर ज्या सात मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहेत त्यांना या सर्व नियम, अटींचे पालन करण्यासाठी मंदिर समिती मदत करणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com