सोलापूर - परीक्षा विभागातील गैरप्रकार, पैसे घेऊन गुण वाढवणे अशा विविध कारणांमुळे सोलापूर विद्यापीठ (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ) 2005पासून चर्चेत आहे. उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनातून गेल्या 15 वर्षांत विद्यापीठाला पाच कोटी 71 लाख रुपये मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाचे अर्ज सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी करतात, ही बाब समोर आली आहे. मे महिन्यात पार पडलेल्या परीक्षांनंतर पदवीच्या तब्बल एक हजार 750 विद्यार्थ्यांनी छायाप्रतीसाठी अर्ज केले आहेत.
अभियांत्रिकीच्या निकालानंतर त्यात आणखी सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थ्यांची भर पडणार आहे. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर 92 हजार विद्यार्थ्यांनी छायाप्रत अन् फेरपडताळणीसाठी अर्ज केले असून, त्यातून विद्यापीठाला तब्बल पावणेसहा कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, त्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोसावा लागला आहे. विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजाभाऊ सरवदे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
|