अंकलखोप (औदुंबर) - "परप्रांतीयांचे वेगवेगळ्या मार्गांनी महाराष्ट्रावर आक्रमण सुरू असताना साहित्यिक गप्प का?' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केला. सदानंद साहित्य मंडळाच्या अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रातील अनेक साहित्यिकांनी समाजाला दिशा देण्यासाठी, त्यांची अस्मिता जागवण्यासाठी ठाम भूमिका घेतल्या. विजय तेंडुलकर यांनी तर मला एक बंदूक आणून द्या, अशी टोकाची भूमिका घेतली. आजचे साहित्यिक, कवी कोणतीच भूमिका का घेत नाहीत? महाराष्ट्र संकटात असताना गप्प का? हा सवाल करण्यासाठीच मी साहित्य संमेलनात सहभागी झालो. राजकीय फायदे-तोट्याचा विचार न करता मी महाराष्ट्रासाठी भांडत राहणार आहे; पण मी एकटाच पुरेसा नाही. साऱ्यांनी लढाई आपली मानली पाहिजे.'' सरकार कोणाचेही असो, महाराष्ट्र संकटात असेल त्या वेळी पक्ष-जातीच्या भिंती पाडून सर्वांनी वज्रमूठ आवळायला हवी, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर हरवलेली मराठी अस्मिता पुन्हा जागी होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माला व्हावा लागला. आज पुन्हा एकदा राज्यावर तसेच संकट घोंगावतेय. एक संवेदनशील मराठी माणूस म्हणून त्याकडे उघड्या डोळ्यांनी नीट पाहा.'' ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, खासदार संजय पाटील आणि इतर काही मान्यवर या वेळी उपस्थित होते.
|