भाजप जिल्हाध्यक्ष निवडीत विखे गटाचीच सरशी

BJP gives preference to vikhe group
BJP gives preference to vikhe group

नगर : भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष जाहीर केले. त्यात नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र गंधे, दक्षिणेतून अरुण मुंडे, तर उत्तरेची जबाबदारी राजेंद्र गोंदकर यांच्यावर सोपवण्यात आली. जिल्ह्यात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गटाच्या विरोधात माजी मंत्री राम शिंदे यांची "टीम' उभी ठाकली होती. मात्र, विखे यांना शह देण्यासाठी ज्यांच्या नावाची शिफारस केली होती, त्यांची नावे ऐनवेळी मागे पडली. अखेर पदाधिकारी निवडीच्या राजकारणात विखे पाटील गटाची सरशी झाल्याचे दिसते. 

पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीनंतर हा पेच प्रदेश पातळीवरून सोडविला जाईल, अशी भूमिका बागडे यांनी स्पष्ट केली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी त्या वेळी 30 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. 

इच्छुकांची मांदियाळी 

दरम्यान, मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 10) पक्षाच्या नगरमधील तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी बागडे यांच्याच प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, भानुदास बेरड, दिलीप गांधी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. जिल्हाध्यक्षपदासाठी दक्षिणेतून 17, उत्तरेतून 14 आणि नगर शहरातून आठ जण इच्छुक होते. 

निवडीमुळे आश्‍चर्याचा धक्का

बागडे यांनी काही इच्छुकांना माघार घेण्याची विनंती केली होती. तथापि, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण व चुरशीमुळे कोणीच ऐकत नव्हते. कोणत्याही नावावर एकमत न झाल्याने प्रत्यक्ष मुलाखती घेण्याचा निर्णय बागडे यांनी घेतला. मुलाखती झाल्यावर जिल्हाध्यक्षपदाचा प्रत्येकाचा अट्टहास पाहून, बागडे यांनी कोअर कमिटीशी चर्चा करून निवडीचा चेंडू प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या कोर्टात टोलवला होता. अखेर प्रदेश पातळीवरून नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. मात्र, त्या सर्वांनाच आश्‍चर्यचकीत करणाऱ्या होत्या. शिंदे, कर्डिले यांच्यावर मात करताना, जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीत अखेर विखे पाटील यांनीच बाजी मारल्याचे दिसते. 

भाजपला प्रथमच तीन जिल्हाध्यक्ष

पूर्वी संपूर्ण जिल्ह्यासाठी एकच अध्यक्ष निवडला जात होता. मात्र, महापालिकेची स्थापना झाल्यावर काही वर्षांनी शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडण्यात येऊ लागले. आता पक्षाचा विस्तार आणखी वाढविण्यासाठी, तसेच नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघ मजबूत करण्यासाठी उत्तर व दक्षिण भागासाठी, तसेच शहरासाठी प्रत्येकी एक, असे एकूण तीन जिल्हाध्यक्ष यंदा प्रथमच निवडण्यात आल्याची माहिती भाजपचे माजी शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com