शिर्डी (नगर) : साईबाबा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे नाते अतूट आहे. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव व आंध्र प्रदेशचे प्रभारी सुनील देवधर यांना शिर्डीतून भाजपचे "मिशन आंध्र प्रदेश' सुरू करायचे आहे. त्यांनी कालच्या शिर्डी भेटीत त्याबाबत सूतोवाच केले.
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या सहकाऱ्यांशी त्यांनी काल (गुरुवारी) संवाद साधला. "मिशन त्रिपुरा' फत्ते झाले. आता त्याच वाटेने आंध्र प्रदेशाला न्यायचे आहे. येथील कार्यकर्त्यांनी त्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
देवधर म्हणाले, ""येथे रोज सरासरी पन्नास हजार भाविक येतात. त्यांत निम्म्याहून अधिक संख्या आंध्र प्रदेश व तेलंगणातील भाविकांची असते. हे लक्षात घेऊन येथे आलेल्या भाविकांना भाजपसोबत जोडण्यासाठी आपल्याला काही तरी करायचे आहे. नेमके काय करायचे, याचे नियोजन यथावकाश करू. खास त्यासाठी मी पुन्हा येईन. मात्र, तोपर्यंत भाजप आणि हिंदुत्व या विषयावर माहिती देणारी तेलगू भाषेतील पत्रके आपापल्या दुकानांत ठेवा. आलेल्या भाविकांना ती रोज वितरित करा. त्यांना हिंदुत्व आणि भाजपसोबत जोडण्याचा प्रयत्न करा.''
आंध्र प्रदेशात अद्यापही भारतीय जनता पक्षाचे बस्तान बसलेले नाही. देवधर त्रिपुराचे प्रभारी असताना तेथील निवडणुकीत भाजपने आश्चर्यकारक यश मिळविले. आता पक्षाने आंध्र प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल "मिशन आंध्र प्रदेश'ची सुरवात शिर्डीतून करण्याचे सूतोवाच केले.
सध्या तेलगू भाषा शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. संघाचे पदाधिकारी घनश्याम दोडिया यांच्या निवासस्थानी जाऊन देवधर यांनी भोजन घेतले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यांनी त्यांचे स्वागत केले. साई अरिहंत पतसंस्थेतर्फे सतीश गंगवाल, बाळासाहेब पटेल व घनश्याम दोडिया यांनी साईंची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.
शिवाजी गोंदकर, गजानन शेर्वेकर, दिलीप गोंदकर, सुनील लोढा, गोपी परदेशी, विठ्ठल जाधव, रवींद्र गोंदकर, किरण बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. संघाच्या जिल्हा व विभाग प्रचारकपदाची जबाबदारी सांभाळत असताना येथील वास्तव्यातील आठवणींना त्यांनी या वेळी उजाळा दिला.
|