कोयनेच्या पाण्याचा यंदा वीज निर्मीतीसह सिंचनासाठी काटकसरीने वापर

कोयनेच्या पाण्याचा यंदा वीज निर्मीतीसह सिंचनासाठी काटकसरीने वापर

पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस जलवर्षात पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा आजच्या तारखेला १३.७६ टीएमसी कमी आहे. त्यामुळे जुनपर्यंत वीज निर्मीतीसह सिंचनासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. यंदाचे जलवर्ष पार पाडताना व्यवस्थापनाला दुष्काळामुळे तारेवरील कसरत करावी लागणार आहे.

गतवर्षी डिसेंबरपर्यंत  पाऊस पडत असल्याने धरणाचा पाणीसाठ्याची शतकाच्यावर वाटचाल होती. मात्र यावर्षी ऑगष्ट अखेरपासुन पावसाने दडी मारल्याने व परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने पाणीसाठा कमी झालेला पहावयास मिळत आहे. आज धरणाचा पाणीसाठा ८६.४१ टीएमसी असुन गतवर्षी तो १००.१७ टीएमसी होता. गतवर्षीच्या तुलनेत १३.७६ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यावर्षी जलाशयात १५७.०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी अतिवृष्टी काळात पायथा वीजगृहातुन ८.४६ टीएमसी व सहावक्र दरवाजांच्या सांडव्यावरुन ५६.४५ टीएमसी असे एकुण ६३.९१ टीएमसी पाणी कोयना नदीपात्रात सोडुन दिले आहे.

१ जुनपासुन पश्चिमेकडे वीजनिर्मीतीसाठी जलवर्षात २२.२१ टीएमसी व पुर्वेकडे सिंचनासाठी ९.३४ टीएमसी असा ३१.५५ टीएमसी पाण्याचा वापर केलेला आहे. ३.७४ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झालेले आहे. पायथा वीजगृहातुन ८५.०३४ दलयुनिट, पोफळी टप्पा १ व २ मधुन ४२४.३९५ दलयुनिट, कोळकेवाडी धरणाच्या माध्यमातुन २२१.९०१ दलयुनिट व टप्पा क्रमांक-४ मधुन ३९४.४५४ दलयुनिट अशी एकुण ११२५.७८४ दलयुनिट वीजनिर्मीती करण्यात आलेली आहे. गतवर्षी एकुण १०६७.०३७ दलयुनिट वीजनिर्मीती झाली होती. यावर्षी पायथा वीजगृह अतिवृष्टीकाळात जास्त दिवस चालु राहिल्याने  तुलनेने यावर्षी ५८.७४७ दलयुनिट वीजनिर्मीती जास्त झालेली पहावयास मिळते.

ऑगष्टपासुन पावसाने दडी मारल्याने पायथावीजगृहातुन सिंचनासाठी पाणी सातत्याने सोडले जात आहे. गतवर्षी ४.३३ टीएमसी पाण्याचा वापर झालेला होता मात्र यावर्षी ९.३४ टीएमसी पाण्याचा झालेला वापर पहाता ५ टीएमसी जादा पाणी पुर्वेकडे सिंचनासाठी झालेला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या पुर्वेकडील तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहिर केला आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या काळात जादा पाणी सोडावे लागणार आहे. राज्याबरोबर शेजारील कर्नाटक राज्याला दुष्काळ परिस्थितीत कोयनाधरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात वरिष्ठ पातळीवर निर्णय झाला तर त्याचा ताण कोयना धरणावर येऊ शकतो. त्यामुळे आजचा पाणीसाठा जरा जपुन व काटकसरीने धरण व्यवस्थापनाला वापरावा लागणार आहे.

सांगली पाटबंधारे विभागांतर्गत लाभक्षेत्रात गतवर्षी उशिरापर्यंत पाऊस पडला होता. यावर्षी दुष्काळामुळे मागणी वाढणार असली तरी कोयना धरणातील असलेला पाणीसाठा पुरेसा असुन कोणतीही अडचण येणार नाही. 

नामदेव करे, कार्यकारी अभियंता, 
सांगली पाटबंधारे विभाग, 

गतवर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडत होता, त्यामुळे १०० टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी ऑगष्टपासुन पाऊस नाही, त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झालेला दिसतो मात्र काटेकोर नियोजनामुळे जुनपर्यंत पाणी पुरेल. 

कुमार पाटील, कार्यकारी अभियंता, 
कोयना सिंचन विभाग,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com