शालेय पोषण आहारासाठी सेंट्रल किचनचा प्रयोग कोल्हापुरात

शालेय पोषण आहारासाठी सेंट्रल किचनचा प्रयोग कोल्हापुरात

कोल्हापूर - शहरातील महापालिका शाळांच्या शालेय पोषण आहाराची जबाबदारी आता अक्षयपात्र फौंडेशन ही संस्था उचलणार आहे. सेंट्रल किचनचा अनोखा प्रयोग यानिमित्ताने होत असून याकामी मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिवांचे पत्र प्राथमिक शिक्षण समितीला मिळाले आहे. एकाचवेळी दोन लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार देता येईल, अशी व्यवस्था संस्थेकडे आहे.

स्थानिक महिला बचत गटांमार्पत सध्या पोषण आहार दिला जातो. त्यांचा रोजगार जाऊ नये यासाठी अक्षयपात्र यंस्थेने संबंधित बचत गटातील व्यक्तीस रोजगार द्यावा, अशी अट घातली गेली आहे. सेंट्रल किचनमधील नामवंत संस्था म्हणून अक्षयपात्र या संस्थेकडे पाहिले जाते. अन्य राज्यात संस्थेने सेंट्रल किचनचा प्रयोग केला आहे.

विद्यार्थ्यांना जाेवर तोही गरम आहार असे संस्थेचे वैशिष्ट्य आहे. स्थानिक बचत गटांनी अलीकडेच महापौरांना निवेदन देऊन अशा पद्धतीच्या किचन पद्धतीला विरोध दर्शविला आहे. पालिकेच्या ५९ शाळांत प्रयोग राबविला जाणार आहे. खासगी अनुदानित शाळांचा नंतर विचार केला जाईल. सध्या ठाणे पालिका तसेच हुबळी येथे अक्षयपात्र फौंडेशनमार्फत आहाराचा पुरवठा केला जातो.

ठाण्यानंतर राज्यात कोल्हापुरात सेंट्रल किचन सुरू होत आहे. संबंधित संस्थेशी करार करताना बचत गटांचा रोजगार हिरावून घेतला जाणार नाही, याची काळजी घेतली आहे. संस्थेकडून तसे हमीपत्र घेतले जाईल. ज्या महिला पोषण आहार देतात, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या रोजगाराची व्यवस्था संस्था करेल. बुधवारी (ता. १९) सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवला आहे.

- शंकर यादव, प्रभारी प्रशासनाधिकारी
 

विद्यार्थ्यांची गळती थांबावी या उद्देशाने केंद्र सरकारने पोषण आहार योजना सुरू केली. प्रारंभी विद्यार्थ्यांना तांदूळ दिला जात होता. त्यासंबंधी तक्रारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात थेट भोजनाची व्यवस्था केली. जिल्हा परिषद शाळांतही पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांना कोणत्त्या दिवशी कोणता आहार द्यावे याचे वेळापत्रक निश्‍चित आहे. बचत गटांना तांदळाचा पुरवठा शासनामार्फत होतो. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ठेकेदाराला बिल दिले जाते.

दृष्टिक्षेपात पोषण आहार
महापालिकेच्या ५९, खासगी प्राथमिकच्या ६५, माध्यमिकच्या ६२ अशा १८० शाळांत आहार दिला जातो. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शंभर ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदूळ दिला जातो.

पहिली ते पाचवीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे चार रुपये तेरा पैसे, सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सहा रुपये अठरा पैसे अतके अनुदान दिले जाते. इंधन, भाजीपाला खरेदीचा यात समावेश आहे.

तूर्तास पालिकेच्या शाळेतील सुमारे दहा विद्यार्थ्यांना अक्षयपात्र ही संस्था आहार देईल. देशातील सर्वात मोठी किचन व्यवस्था अशी अक्षयपात्रची ओळख आहे. या संस्थेला काम मिळाल्यानंतर बचत गटांचे काय होणार असा प्रश्‍न होता. त्यांच्याकडे मदतनीस म्हणून काम पाहतात त्यांच्याही हाताचा रोजगार जाणार नाही. बचत गटांना ठेका आहे त्यांच्यातील कुटुंबातील रोजगाराची व्यवस्था ही संस्था करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com