भीती दाखवू नका, आम्ही चौकशीला घाबरत नाही : चंद्रकांत पाटील

Challenge by BJP state president Chandrakant Patil to government
Challenge by BJP state president Chandrakant Patil to government

सांगली - आम्ही सत्तेत असताना सगळे लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जेवढ्या चौकशा लावायच्या त्या लावा. आम्ही चौकशीला घाबरत नाही. त्याची भीती दाखवू नका, असे प्रतिआव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. त्याचवेळी, चौकशीच्या नादात प्रकल्प रखडल्यास त्याची किंमत वाढते. त्यामुळे चौकशीचे अहवाल लवकर आणा, असेही आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ते म्हणाले, ‘‘जनादेशाचा अनादर आणि नव्या सरकारकडून दररोज उठून जुन्या सरकारचे निर्णय रद्द या प्रकारामुळे नवीन काही करण्याकडे लक्ष नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने दिलेली कर्जमाफी फसवी आहे. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनी आठ हजार रुपये दिले. त्यात एक रुपयाही वाढ नाही. लोकोपयोगी निर्णय रद्द करताना पर्यायी निर्णय नाही. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. या विरोधात मंगळवारी (ता.२५) राज्यातील सर्व तालुक्‍यांमध्ये तहसील कार्यालयांसमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचवेळी अधिवेशनात आम्ही सरकारविरोधात संघर्ष करू. त्याचवेळी लोक रस्त्यावर संघर्ष करतील.’’ राज्यात भाजपमध्ये नाराजी असल्याचा आरोप खोडून काढताना ते म्हणाले, ‘‘भाजपमध्ये नाराजी नाही. कोणताही असंतोष नाही.’’

शिवसेनेशी भावनिक नाते

श्री. पाटील म्हणाले, ‘‘दोन भाऊ भांडून वेगळे रहात असले तरी भावनिक नाते आहेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत. त्या दोघांमध्ये भावनिक नाते आहे; मात्र त्यांना भेटण्यासाठी उशीरच झाला. मुख्यमंत्री झाल्यावर लवकर जाण्याची गरज होती. पण, तीन महिने ते बिचकत होते. पवार काय म्हणतात, थोरात काय म्हणतात, असे त्यांना वाटत असावे. मात्र आता ते स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले आहेत. अयोध्येला जाणार आहेत, एनपीआर करु म्हणत आहेत. आता ते धाडस करत आहेत.’’ दोन भाऊ एकत्र येतील की नाही हे काळच ठरवेल अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

‘तो’ जनादेशाचा अनादर नव्हता

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येवून सत्ता करणे हा जनादेशाचा अनादर आहे. मात्र अजितदादांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणे हा जनादेशाचा अनादर नव्हता असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ते म्हणाले, ‘‘विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महिनाभर सरकार स्थापन झाले नाही. नैसर्गिक युती असताना त्याला प्रतिसाद न देता शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीशी संधान बांधले. त्यामुळे आम्ही एक मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. निकाल पूर्ण लागण्यापुर्वीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. एकदाही ते चर्चेला आले नाहीत.’’ 

पवारांचा व्यवस्थेवरच अविश्‍वास

राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट उभा केला; मग मशिदीसाठी का नाही? असा प्रश्‍न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याबाबत श्री. पाटील म्हणाले, ‘‘शरद पवारांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या घटनेवर आधारित व्यवस्थेवरच अविश्‍वास दिसत आहे. राम मंदिरासाठी ट्रस्ट उभारणीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्यांनी मशिदीसाठी ट्रस्टचा का नाही निर्णय दिला? एका बाजूने घटनेवर विश्‍वास आहे, म्हणायचे आणि घटनेच्या आधारे असलेल्या सगळ्या व्यवस्थेला विरोध करायचे हे पवारांचे धोरण आहे. राम मंदिर उभारले जाणे हा अभिमानाचा विषय आहे. मशिदीसाठी ट्रस्ट उभारण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पवारांनी मागणी करावी.’’
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com