करमाळा - माझ्या हाती नसती लेखणी तर असती छिन्नी, सतार, बासरी अथवा कुंचला मी कशानेही उपसत राहिलो असतो अतोनात कोलाहल मनातला...
कवी नागराज मंजुळे यांच्या कवितेतील या अर्थपूर्ण ओळी खूप काही सांगून जातात... ज्या वयात हातात पाटी-पेन्सिल असायला हवी, त्या वयात परिस्थितीने या मुलाच्या हातात लेखणीऐवजी दगड फोडायचा हातोडा दिला आहे. घरच्या परिस्थितीमुळे कर्नाटकातून काही कामगार मुला-बाळांसह दगड फोडण्यासाठी महाराष्ट्रात आले आहेत. करमाळा तालुक्यातील अंजनडोह-पोंधवडी रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्यावर सध्या खडी फोडण्याचे काम सुरू आहे.
या रस्त्यावर अवघ्या साडेपाच वर्षांचा मुलगा अगदी सराईतपणे खडी फोडण्याचे काम करतो आहे. हे जगण्यातील भयानक वास्तव कोणालाही आतून-बाहेरून हालवून सोडल्याशिवाय राहात नाही. अगदी सकाळी आठ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत आपल्या आजोबांबरोबर खडी फोडण्याचे काम करणाऱ्या या चिमुकल्या मुलाचे नाव आहे लक्ष्मण रतन काळे.
मल्लेश काळे (रा. इंडी, जि. विजयपूर) हे लक्ष्मणचे आजोबा आहेत.
वर्षानुवर्षे खडी फोडण्याचे काम हे लोक करीत आहेत. आपल्या कुटुंबासह वर्षभर हे खडी फोडण्याचे काम करतात. या कामानिमित्त सतत महाराष्ट्रभर भटकंती करतात. अशी अनेक कुटुंबे आहेत. भटकंतीमुळे ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. अनेक मुलांनी शाळेची पायरीही ओलांडली नसल्याचे हे लोक सांगतात.
देशात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागू झालेला असतानाही अशी अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहेत. मुलांना शाळेत जायची संधी मिळत नसल्याने ते आई-वडिलांसोबत खडी फोडण्याचे काम करतात.
आम्ही सर्व जण खडी फोडण्याचे काम करतो. मला तीन मुले आहेत. एक ढिगारा फोडण्यासाठी 700 रुपये मिळतात. लक्ष्मण माझा नातू आहे. गावाकडे आमचे घर आहे. शेती नाही. आम्ही वर्षभर बाहेरच असतो. फक्त यात्रेला गावाकडे जातो. वर्षभर भटकंती करावी लागत असल्याने आमच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे ही मुलेही खडी फोडतात. वाईट वाटते, पण काय करणार. पोटासाठी करावं लागतंय.
- मल्लेश काळे, मजूर
|