इस्लामपूर, ता. 20 : कापूसखेड (ता. वाळवा, जि. सांगली ) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत राडा झाला. दोन्ही बाजूंनी गोळीबार, सशस्त्र व दगडांनी हल्ला करण्याचा प्रकार घडला. गुरुवारी (ता. 19) ही घटना घडली.
याप्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या प्रत्येकी एक प्रमाणे दोघांना अटक केली आहे. शिवाजी विठ्ठल मरळे (वय 66) व अतुल दिलीप मोकाशी (वय 30) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघांना 26 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोन्ही गटांविरोधात खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्राचा वापर, असे गुन्हे नोंद केले आहेत.
अतुल मोकाशी याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी सागर शिवाजी मरळे यांच्याबरोबर रानातील पाण्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. यात सागर मयत झाला होता. त्यात माझ्यासह कुटुंबीयांवर खुनाचा गुन्हा दाखल होता आणि सर्वांना अटक झाली होती. आम्हाला मारहाण केल्याप्रकरणी सागरचे वडील शिवाजी मरळे, अमोल कोळी, अशोक कोळी यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 10 महिन्यांपूर्वी आम्ही निर्दोष मुक्त झालो आहोत. आम्ही अटकेत असताना सागरचे दाजी विकास विष्णू अनुसे (बावची) यांनी त्यांच्या चार साथीदारांसह आमचे घर जाळले होते. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
आमची मुक्तता झाल्यापासून वारंवार खोट्या तक्रारी देत असून चिडून आहेत. गुरुवारी सकाळी मी शेतात गेल्यावर अनुसे आणि काही लोकांनी शेतात मला रॉडने व दगडाने मारहाण केली. खाली पाडून गळा आवळला. मी जीव वाचवून पळून जात असताना विकास अनुसेने मला जिवंत मरण्याच्या उद्देशाने गोळी झाडली. मी चुकवली. नंतर दोन गोळ्या उडाल्या नाहीत म्हणून त्याने पिस्टल फेकून मारले. शिवाजी मरळे, विकास अनुसे व अन्य तीन अनोळखी लोकांनी हा प्रकार केल्याचे म्हटले आहे.
शिवाजी मरळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नितीन दिलीप मोकाशी व त्याच्या कुटुंबीयांनी मिळून 6 एप्रिल 2018 ला शेतीच्या कारणावरून माझा मुलगा सागर याचा खून केला. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले. त्यानंतर मी मुंबईत उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अतुल व नितीन मोकाशी हे रस्त्यावरून येता-जाता आमच्याकडे रागाने बघत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी आमच्या घराच्या दरवाजा व खिडक्यांचे नुकसान केले असून त्याची पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
माझ्या सुनेलाही त्यांनी शिवीगाळ केली आहे. मलाही "आम्ही मर्डरमधून सुटून आलो आहे, आता तुला दाखवतो' अशी दमदाटी केली होती. गुरुवारी सकाळी मी व सून शेतात वैरण आणण्यासाठी गेलो असताना तिथे नितीन व अतुल मोकाशी उभे होते. त्यांनी माझ्या सुनेला शिवी देत असताना अतुलने "तुला आता मस्ती आली आहे, तुला जिवंत ठेवून उपयोग नाही' असे म्हणत माझ्यावर कोयता उगारला. त्याचवेळी नितीनने बंदुकीसारख्या हत्याराने माझ्यावर गोळी झाडली. त्यातून मी वाचलो आणि दोघांनीही आरडाओरडा केला. त्यामुळे ते दोघे पळून गेले. घटनेची इस्लामपूर पोलिसांत नोंद असून पोलिस तपास करत आहेत.
संपादन : युवराज यादव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.