नद्यांच्या स्वच्छतेच्या केवळ गप्पाच 

नद्यांच्या स्वच्छतेच्या केवळ गप्पाच 

कऱ्हाड - येथील कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेची मोहीम मागेच पडत आहे. काही दिवसांपूर्वी कोयना व कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी दोन कोटींचा निधी आला. त्यातूनही स्वच्छता अथवा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काहीच झाले नाही. त्यामुळे नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या केवळ कागदोपत्री गप्पाच रंगल्या. काहीच हालचाल न झाल्याने नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची वाढ होत आहे. 

शहरातील अनेक ठिकाणचे सांडपाणी नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापक जागृतीसह नदी प्रदूषण करणारांवर ठोस कारवाईची गरज आहे. शासनासह पालिकेच्या समन्वयाअभावी नदी प्रदूषणाचा प्रश्न जटिल बनल्याची सद्य:स्थिती आहे. कृष्णा व कोयना नदीच्या स्वच्छतेकडे अनेक वर्षे दुर्लक्षच झाले आहे. त्या पाण्याचा वापर केवळ पाणी योजना चालवण्यासाठी होत आहे. मात्र, नदीत दररोज मिसळणारे सांडपाणी, मूर्ती व निर्माल्य आदींकडे दुर्लक्ष होताना दिसते. पाणी प्रदूषण होण्याची अनेक कारणे आहेत. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. त्यामुळे प्रदूषणात वाढ होताना दिसते. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असल्याने नदी पात्र अस्वच्छतेच्या गर्तेत आहे. पालिकेसह शासनाचेही त्याकडे दुर्लक्षच दिसते. 

दुष्काळी तालुक्‍यात पाणी मिळावे म्हणून कृष्णा नदीचे पाणी टेंभू योजनद्वारे अडवण्यात आले. तेथून पाणी उचलण्यासाठी पाण्याची आवश्‍यक पातळी ठेवावी लागते. त्यामुळे नदीचे वाहते पाणी अडवण्यात आले. त्याचीही शहराला डोकेदुखी ठरू लागली आहे. कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्याचा वाहता प्रवाह पूर्ण थांबला आहे. परिणामी पाण्यामध्ये शेवाळासह जलपर्णीचा त्रास उद्‌भवू लागला आहे. त्यामुळेही प्रदूषण वाढल्याचे दिसते. पाण्याला दुर्गंधी सुटत आहे. नदीत सांडपाणी मिसळते. त्याची शहरात तब्बल 13 ठिकाणे आहेत. त्यातील एकावरही आजअखेर कारवाई नाही. त्यामुळे पाणी प्रदूषित होण्यामध्ये वाढच होत आहे. 

नद्या स्वच्छतेसाठी आलेला निधी गेला कुठे? 
कृष्णा व कोयना नद्यांच्या स्वच्छतेसाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून कऱ्हाडला दोन कोटी 50 लाखांचा निधी दिला होता. त्यात नदीच्या स्वच्छतेसाठी एक कोटी 20 लाख, तर उर्वरीत रक्कम अन्य कामासाठी होती. मात्र, त्यातील काहीच काम झाले नाही. निधी आला तर मग तो गेला कुठे? असा सामान्यांना पडला प्रश्न आहे. उर्वरित रकमेतून सभा मंडप, कपडे बदलसाठी खोली, नदीकाठावर हिरवाई आदी कामे होणार होती. त्यातील एकही काम दिसत नाही. त्यामुळे नद्यांच्या स्वच्छतेसाठी आलेला निधी नक्की गेला कुठे, याचे कोडे उलगडणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com