नातेपुते परिसरातील शेतकरी याच्यामुळे धास्तावले

नातेपुते परिसरातील शेतकरी याच्यामुळे धास्तावले

नातेपुते (जि. सोलापूर) ः अतिवृष्टीमधून सावरणारा शेतकरी मंगळवारपासून हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे व ढगाळ वातावरणामुळे पुरा धास्तावला आहे. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत चाललेला पाऊस, त्यात शेतीत अजूनही वापसा आलेला नाही. गवताचे प्रमाण वाढले आहे. ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण होणारी शेतीची कामे अजूनही झालेली नाहीत. बाजरी व मका यांच्या सुगी अजून सुरू आहेत, यामुळे बळिराजा चिंताग्रस्त आहे. 
दरवर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये ऊस व केळी यांना दिला जाणारा खतांचा डोस अजून दिलेला नाही. पुढील पिकांसाठी शेतीची मशागतीची कामे पूर्ण नाहीत. या पूर्ण कामात मग्न असलेला शेतकरी अतिवृष्टीचे सावट विसरत नाही, तोपर्यंत गेल्या तीन दिवसापासून हवामानात अचानक बदल झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे तीन दिवस सूर्यदर्शन झाले नाही. या सर्वांचा परिणाम शेती व पुढील पिकांवर, उभ्या असलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. 
गोहत्याबंदीने मटण महागले ः रघुनाथ पाटील
वातावरणाचा सर्वांत जास्त फटका द्राक्षबागांना बसणार आहे. या वातावरणामुळे कुजेचे प्रमाण व डावण्या रोग वाढणार आहे. द्राक्षांची वाढ होणार नाही. हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची लक्षणे आहेत. लाखो रुपये खर्च झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेला आहे. डाळिंब बागांत वाढलेल्या पावसाने अजूनही फळांची सेटिंग झाली नाही. बागांमध्ये तगारा वाढत आहे व ज्या काही थोड्या बागा सेट झालेल्या आहेत त्या बागांमध्ये या वातावरणामुळे तेल्या रोग वाढण्याची शक्‍यता आहे. फळ पक्व नसताना कलर येत आहे. डाळिंब बागांमध्ये गवताचे प्रमाण वाढले आहे. अचानक कमी झालेला दर, नंतर अवकाळी व आता ढगाळ वातावरण, त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे किती रुपयांचे नुकसान होणार, हे समजू शकत नाही. 

अर्थकारण बिघडतेय 
अद्यापही थंडी नसल्यामुळे गहू व हरभरा याची लागण झाली नाही. जेथे काही थोड्या प्रमाणात लागण झाली, तेथे तांबोरा व बुरशीजन्य रोग या वातावरणामुळे येणार आहेत. उसावर तांबोरा पडणार आहे. भाजीपाला शेतातून पूर्ण नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्यावर करपा रोग वाढल्यामुळे कांद्याचे नुकसान झाले आहेत, परिणामतः मोठी दरवाढ झाली आहे. शेतामध्ये कामाचा प्रचंड व्याप वाढल्यामुळे मजूर मिळत नाहीत व मजुरीचे दरही वाढले आहेत. 

समुद्रकिनारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आपल्या पश्‍चिम महाराष्ट्रातही पुन्हा एकदा पाऊस येऊ शकतो. दुर्दैवाने जर हा पाऊस झाला तर शेती व शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होणार आहे. द्राक्षबागांना मोठा फटका बसणार आहे व एकूणच पिकांवर रोगराई वाढण्याची शक्‍यता आहे. 
- राहुल जठार, निर्यातक्षम डाळिंब उत्पादक  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com