पारनेर (जि. नगर) - संसदेसारख्या पवित्र मंदिरात गुंड व गुन्हेगार जाऊन बसले. त्यामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली. भ्रष्टाचार वाढला. तरुणांनी भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी केले.
अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू आर्टस, सायन्स महाविद्यालयात आज कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सभापती राहुल झावरे, राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी, प्राचार्य रंगनाथ आहेर आदी उपस्थित होते. हजारे म्हणाले, 'राजकारणात सर्वच लोक वाईट नसतात. त्यामुळेच समाज व देशाचे भले होत आहे.
युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. त्यामुळे तरुणच देश घडविण्याचे काम करू शकतात. देश नव्या वळणावर आहे. राष्ट्रीय पुरुषांचे चारित्र्य वाचल्याने जीवनात, जगण्यात एक वेगळी ऊर्जा येते. त्यासाठी संघटन तयार करा. त्यातील माणसे निष्कलंक असावीत. एका गावातून 15 कार्यकर्ते तयार व्हावेत. त्यासाठी प्रतिज्ञापत्र बंधनकारक राहील.'' देशातून साडेपाच हजार युवकांचे शपथपत्र दाखल झाले आहेत, असे हजारे म्हणाले.
|