'उजनी'च्या काठावरील पीक पॅटर्न बदलतोय 

'उजनी'च्या काठावरील पीक पॅटर्न बदलतोय 

चिखलठाण (ता. करमाळा, जि. सोलापूर) : उजनी धरणकाठावरील शेतकऱ्यांचा पिकाचा पॅटर्न सध्या बदलत असून उसाला पर्याय म्हणून केळी पिकाच्या लागवडीचे प्रमाण वाढत आहे. या परिसरातील ऊसउत्पादक शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणावर केळी पिकाकडे वळताना दिसत आहे. करमाळा तालुक्‍यात पाच-सहा वर्षांपूर्वी केवळ 750 एकरवर असणाऱ्या या पिकाखालील क्षेत्रामध्ये गेल्या तीन-चार वर्षांत झपाट्याने वाढ होत असून तालुक्‍यातील साडेतीन हजार एकरापेक्षा जादा क्षेत्रावर हे सध्या हे पीक घेतले जात आहे. 

ऊस पिकाचा वाढलेला उत्पादनखर्च, घटलेले सरासरी उत्पादन, या पिकामुळे जमिनीचा बिघडत चाललेला पोत, ऊस गाळपासाठी येणाऱ्या अडचणी, ऊसबिले मिळण्यासाठी होणारा विलंब, यामधील गाळपासाठी होणारा राजकीय हस्तक्षेप याला कंटाळलेला शेतकरी मोठ्या प्रमाणावर केळी पिकाकडे वळू लागला असून गेल्या तीन-चार वर्षांत या पिकासाठी चांगला दर मिळत असल्याने या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले आहे. लागवडीनंतर 11 महिन्यांमध्ये काढणीला येणारे, लागवडीनंतर दोन वर्षांत दोन खोडवे घेऊन तीन वेळा रोख उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे पाहात आहेत. यात लागवडीसाठी मुख्यतः G9 वाणाची निवड मोठ्या प्रमाणात करतात. टिश्‍युकल्चरची रोपे मागवून सात बाय पाच अंतरावर याची लागवड केली जात आहे. विशेष म्हणजे, या पिकासाठी 100 टक्के शेतकरी ठिबक सिंचनाचा वापर करत आहेत. तालुक्‍यातील कंदर, कविटगाव, वांगी, दहिगाव शेटफळ, उमरड, वाशिंबे, पारेवाडी या गावांतील लागवडीचे प्रमाण जास्त आहे. 

शेतकरी गटांची व शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती 
तालुक्‍यातील केळी उत्पादक शेतकरी एकत्र येऊन शेतकरी गटांची व शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती करत आहेत. याचा छोट्या शेतकऱ्यांना फायदा होत आहे. एकत्र रोपे खरेदीपासून मार्केटिंगपर्यंत गटाच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. यामध्ये कंदर, केडगाव, चिखलठाण, उमरड या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार झाले आहेत. या माध्यमातून केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. 

आखाती देशांमध्ये केळीची निर्यात 
तालुक्‍यात निसर्गत: उपलब्ध असणारे कोरडे, स्वच्छ हवामान केळी पिकासाठी पूरक व पोषक असून यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढून निर्यातक्षम केळी उत्पादन घेणे शक्‍य झाले आहे. जळगाव येथील केळीसारखे चांगल्या दर्जाच्या केळीचे उत्पादन होत असल्याने तालुक्‍यातून दरवर्षी 60 हजार टन केळी उत्पादन होत आहे. त्यापैकी 18 हजार टन केळी मलेशिया, इराण, इराक, उमान, सौदी, कुवेत या आखती देशांमध्ये निर्यात केली जात आहे. यासाठी देसाई, मदर डेअरी, आय. एन.आय, सह्याद्री फार्मस, के. डी. एक्‍स्पोर्ट या कंपन्या शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करून शेतकऱ्यांच्या शेतावर किंवा पॅकहाउसमध्ये पॅकिंग करून परदेशात निर्यात करत आहेत. याशिवाय रिलायन्स, महिंद्रा, शाईनसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून केळीला मॉलसाठी मागणी आहे. तर दिल्ली, हरियाना, जम्मू-काश्‍मीर या भागातील बाजारपेठेत तालुक्‍यातील केळीला मोठी मागणी असून त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे शक्‍य झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com