सातारा : टाेल प्रश्‍‍नाचे आता उरले फक्‍त दीड तास

Anewadi Toll Plaza
Anewadi Toll Plaza

सातारा : महामार्गाची दुरवस्था, वाढते अपघात आणि सोयी सुविधांची वाणवा यामुळे टोलनाका बंद आंदोलन करण्याचा एल्गार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आज (मंगळवार) दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महामार्गाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक जाणार का? ते आक्रमक होणार का? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

टोलबंद आंदोलन करण्याचा निर्णय

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टोलनाका बंद करण्याचा यापूर्वी अल्टिमेटम दिला होता. त्यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या दालनात ता. 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी यांची बैठक घेतली होती. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती आणि सोयी सुविधा उभारण्याबाबत संबंधितांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 18) सकाळी 10 वाजता आनेवाडी (ता. जावळी) टोलनाका येथे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली टोलबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे होते उपस्‍थितीत

त्याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, अमोल मोहिते, जयेंद्र चव्हाण, शेखर मोरे पाटील, राजू भोसले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य आशुतोष चव्हाण, पोपटराव मोहिते, ऍड. विक्रम पवार, फिरोज पठाण, राजू मोरे आदींसह कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 16) प्रभारी जिल्हाधिकारी राम शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना निवेदन दिले होते. 

जीवाशी खेळणे थांबवा

निवेदनात नमूद केले होते की, पुणे- बंगळूग़ राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दरवर्षीची ही परिस्थिती असून टोल वसुली नेमकी कशासाठी आहे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधीत ठेकेदार यांनी सातारा- पुणे महामार्गाची दुरुस्ती करावी आणि वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. अशी मागणी करत शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा नऊ नोव्हेंबर रोजी दिला होता. यावरच न थांबता त्यांनी रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून चर्चा केली होती. तसे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्याची मागणी केली होती. 

मुदतीला महिना उलटला

तद्‌नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली होती. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी सातारी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. चिटणिस, रिलायन्स कंपनीचे श्री. गांधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे कार्पेट करुन भरले जातील असे सांगितले होते. मात्र, एक महिना होत आला तरीही ती कामे झाली नाहीत. त्यामुळे आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे. 


समर्थक उपस्थितीत राहणार का?

शिवेंद्रसिंहराजे हे सध्या अधिवेशनानिमित्त नागपूर येथे आहेत. त्यांच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने आज (मंगळवार, ता. 18) दुपारी चार वाजता महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्स कंपनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक उपस्थितीत राहणार का? ते आक्रमकपणे भूमिका मांडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com