
सांगली - रातभर ऐकलं रामायणं अन् सकाळी रामाची सीता कोण...असंच बऱ्याचदा धार्मिक पोथीपुराणांच्या वाचनाबाबत होत असतं. ती बऱ्याचदा घोकंपट्टीच असते. मात्र दुसऱ्या इयत्तेतच परिस्थितीने शिक्षण सोडून दारोदार घरकामांचे कष्ट वाट्याला आलेल्या माऊलीने भगवद्गीतेसारखा ग्रंथ तोंडपाठ करावा. त्यातही ऱ्हस्व, दीर्घ, उच्चार, अनुनासिक शब्द अशा बारीक - सारीक गोष्टींसह. प्रत्येक श्लोकाचे विश्लेषणही अचूक. त्यांच्या या गीता पठणावर खुद्द श्रृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी 21 हजारांचे पारितोषिक देऊन अचुकतेचा शिक्का उमटवला आहे.
उषा रावणंग असं त्या माऊलीचं नाव. आपल्या शाळकरी मुलासाठी त्यांनी गीतेचे 18 अध्याय व सुमारे 700 श्लोक तोंडपाठ केले. आता ते त्या सलग दोन तास खणखणीत आवाजात म्हणू शकतात. तशी त्यांची अक्षर ओळख अगदी अल्पच. त्या मूळच्या रत्नागिरीच्या. पहिलीनंतर त्या दुसरीत गेल्या मात्र परिस्थिती अभावी शिक्षण थांबले. शाळा - महाविद्यालयात जायच्या वयात त्या आई - वडिलांसह दुनियादारी करीत त्या सांगलीत आल्या. इथंच त्यांची योगेश रावणंग यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली.
हेही वाचा - राणे म्हणाले, उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री
विश्रामबाग परिसरात चार घरची धुणी - भांडी करून त्यांनी आपला संसार उभा केला. संसारवेलीवर दोन फुले उमलली. आपल्याला जमलं नाही तरी आपल्या मुलांनी शिकले पाहिजे असा त्यांचा निर्धार. चार घरी गेल्यानंतर आजी - आजोबांकडून मनाचे श्लोक, रामरक्षा, पुराणातल्या गोष्टी ऐकणारी मुले पाहून तसंच आपल्या मुलांनी शिकायला हवं असं त्यांना वाटू लागलं. ओघानेच त्यातला भक्तिभाव, अर्थही त्या समजून घेऊ लागल्या. त्यांची ती रुची पाहून ज्येष्ठ नागरिक शामराव भिडे यांनी मोफत संस्कारवर्ग घेणारे अनिल रुईकर यांच्याकडे जायचा सल्ला दिला.
त्या तेव्हा तिसरीत शिकणाऱ्या चिरंजीव हृषीकेशसह संस्कारवर्गात सोडायच्या निमित्ताने जाऊ लागल्या. त्यानिमित्ताने त्यांच्या कानावरही दररोज काही तरी चांगले पडू लागले. जणू दररोज त्या संस्कारवर्गाला जाऊ लागल्या. हळूहळू दररोज एक-एक अक्षर शिकू लागल्या. गीतेचे शब्द-स्वर त्यांनाही खुणावू लागले. मुलगा म्हणतो ते चूक-बरोबर हे समजायला हवं तर आपल्यालाही शिकायला हवं. मग त्यासाठी मग त्यांनीही मनाचा हिय्या करून मुलासह संस्कारवर्ग सुरू केला. आता जिद्दीने त्यांनी गेल्या तीन वर्षांत गीता मुखोद्गत केली आहे.
हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यातील चौदा गावांचे पाणी कोणत्याही क्षणी बंद; कारण काय?
चिरंजीवासह लख्ख यश
उमा यांची पाठांतराची तयारी पाहून अनिल रुईकर यांनी दोघांनाही श्रृंगेरी पीठाची परीक्षा देण्यासाठी तयार केले. खरे तर ही त्यांच्या आयुष्यातील पहिलीच परीक्षा. ती ही इतकी कठीण. 18 अध्यायांपैकी कोणताही अध्याय व त्यातील श्लोकाला सुरवात केली जाते. पाठोपाठ तो पूर्ण म्हटले तरच उत्तीर्ण. या कठीण परीक्षेत दोघा मायलेकरांनी लख्ख यश मिळवले. पीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते त्यांनी 21 हजारांचे पारितोषिकही पटकावले.
गीतेच्या अवीट माधुर्यातून आत्मिक, मानसिक बळ
""आयुष्य टक्केटोणपे सहन करीत सुरू होतेच, मात्र गीता वाचनामुळे ते आनंददायी झाले. माझ्या स्वभाव, वागणे, बोलण्यात आमूलाग्र बदल झाला. समस्येचा सामना शांत मनाने, संयमाने करण्याचे धैर्य अंगी आले. कठीण प्रसंगात मला गीतेतील अवीट माधुर्य आणि सौंदर्य आत्मिक व मानसिक बळ देते.''- उषा रावणंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.