सोलापूर - दुष्काळी स्थितीमुळे राज्यभरात 4 हजार 567 ठिकाणी छावण्या सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हास्तरावर दाखल झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, निवडणुका झाल्यावर छावण्यांचे पाहू, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
सोलापूर, नगर, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, यवतमाळ, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील बहुतांश गावांमधील पैसेवारी 50 पैशांहून कमी नोंदविण्यात आली आहे. पाणी आणि चाराटंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला मंगळवारपासून (ता. 19) प्रारंभ होत आहे.
प्रचाराची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून छावण्या सुरू करण्यात निवडणुकीचे कारण दिले जात असल्याने राज्यातील सुमारे 90 लाख जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्याची स्थिती
1.34 कोटी एकूण पशुधन
144.42 लाख टन आवश्यक चारा
4,567 - छावण्यांचे प्रस्ताव
129 - सुरू असलेल्या छावण्या
74,405 - छावण्यांमधील पशुधन
दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने जनावरांना चाऱ्याची गरज असून स्वयंसेवी संस्था, गोशाळा आणि महसूल प्रशासनाच्या 129 छावण्यांद्वारे 74 हजार 405 जनावरांना चारा पुरविला जात आहे. आचारसंहिता आणि चारा छावण्यांचा काहीच संबंध नसेल. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार छावण्या सुरू करायला काही हरकत नसावी.
- डॉ. संतोष पंचपोर, अवर सचिव, पशुसंवर्धन विभाग
|