raju shetty
raju shetty

फसव्या कर्जमाफीमुळे शेतकरी आणखी कोंडीत: खा. शेट्टी

राहुरी फॅक्टरी (नगर) : "इथेनॉल दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही. कर्जमाफी फसवी ठरली. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडला. दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील." असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

काल (बुधवारी) रात्री टाकळीमियाँ (ता. राहुरी) येथे शेतकरी मेळाव्यानंतर खा. शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'स्वाभिमानी' चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, नूतन जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते. 

खा. शेट्टी पुढे म्हणाले, "इथेनॉलचे दर साडेतीन रुपयांनी वाढविले. पण त्यावर जीएसटी लावला. तो रद्द केला पाहिजे. उत्पादना नंतर एक महिन्याच्या आंत तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदी केले पाहिजे. परंतू तसे होत नाही. तेल कंपन्या केंद्र सरकारचे ऐकत नाहीत. केंद्राच्या धोरणांची अंमलबजावणी होत नाही. तोपर्यंत इथेनॉल दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही." 

"शेतमालाला दीडपट हमीभाव. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी साठी देशातील १९३ संघटना एकत्र आल्या आहेत. येत्या पावसाळी अधिवेशनात ही दोन्ही विधेयके लोकसभेसमोर मांडणार आहे. सर्व पक्षांनी या विधेयकांना पाठींबा द्यायला हवा. या विधेयकांचे कायद्यात रुपांतर होईल. तेव्हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील." 

"राज्य सरकारची कर्जमाफी फसवी ठरली. एक वर्षापासून बँकांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे त्यावरील व्याजासाठी बँका शेतकऱ्यांना तगादे करीत आहेत. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाही. दूधाचे दर पडले. शेतमालाचे दर कोसळले. खरीप तोंडावर असतांना शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकरी सरकार पासून दूरावला आहे." असेही खा. शेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com