सोलापूर : दुष्काळ, गारपीट, अवकाळी अन् गडगडलेले शेतमालांचे दर, बॅंकांचा कर्जवाटपात ठेंगा व सरकारी मदतीची प्रतीक्षा आणि डोक्यावरील सावकाराचे कर्ज या प्रमुख कारणांमुळे मागील पाच वर्षांत राज्यात तब्बल 14 हजार 74 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये अमरावती विभाग अव्वल असून औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.
मागील तीन-चार वर्षांत राज्यात दोनवेळा दुष्काळ पडल्याने रब्बी व खरीप हंगाम पुरता वाया गेला. त्यातच शेतमालांचे दरही अस्थिर आहेत. सरकारने हमीभावाने खरेदी केलेल्या शेतमालांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत. कर्जमाफीची प्रतीक्षा तर तूर, हरभरा, कांदा अनुदानाची व हमीभावाचीही रक्कम बहुतांशी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दुष्काळ निधी अथवा नुकसान भरपाईची प्रतीक्षाच आहे. दुष्काळामुळे शेतात उभे पीक नसल्याने बॅंकाही दरवाजात उभ्या करीत नाहीत. या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असलेल्या शेतकऱ्याला मुला-मुलीच्या विवाहासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे नाइलाजास्तव खासगी सावकारांकडून चढ्या व्याजदराने कर्ज घ्यावे लागते. त्यासाठी शेती गहाण ठेवावी लागते. काही दिवसांनंतर सावकाराचा तगादा, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि त्यातच दुसऱ्या मुला-मुलीचा विवाह तोंडावर असतो. त्यामुळे या सर्व परिस्थितीला कंटाळून शेतकरी जगाचा निरोप घेतो.
विभागनिहाय पाच वर्षांतील आत्महत्या
अमरावती : 5,232
औरंगाबाद : 4,698
नाशिक : 2,153
नागपूर : 1,585
पुणे : 391
कोकण : 15
एकूण : 14,074
18 वर्षांतील शेतकरी आत्महत्या
2001 : 62
2002 : 122
2003 : 180
2004 : 640
2005 : 609
2006 : 2,376
2007 : 2,076
2008 : 1,966
2009 : 1,605
2010 : 1,741
2011 : 1,518
2012 : 1,473
2013 : 1,296
2014 : 2,039
2015 : 3,263
2016 : 3,080
2017 : 2,917
2018 : 2,761
एकूण : 29,724
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.