विहिरी, ठिबक, पंपांची भरपाई रामभरोसे!

वाजेवाडी - पाण्याच्या लोटाने शेतीपिकांसह ठिबक सिंचन संच व शेतजमीन वाहून तेथे खड्डा पडून मोठे नुकसान झाले आहे.
वाजेवाडी - पाण्याच्या लोटाने शेतीपिकांसह ठिबक सिंचन संच व शेतजमीन वाहून तेथे खड्डा पडून मोठे नुकसान झाले आहे.

कऱ्हाड - महापुराच्या फटक्‍यात पिकांचे नुकसान झाले. त्याचे पंचनामे सध्या सुरू आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून केलेले ठिबक सिंचन संच, पाण्याबरोबर वाहिलेल्या विजेच्या मोटारी, महापुरात पडलेल्या-मुजलेल्या विहिरी, बांधावरील पडलेली फळझाडे, लाखो रुपये खर्च करून तयार केलेली आणि पावसाने डोळ्यादेखत भुईसपाट झालेली हरितगृहे, शेडनेट, रोपांसाठी तयार केलेल्या नर्सरींचे पंचनामे झाले. मात्र, त्यांच्या भरपाईसंदर्भात शासन निर्णयात उल्लेखच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडणार असून शेतकऱ्यांना महापुराच्या फटक्‍यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन भरपाई देण्याची गरज आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा मोठा तडाखा बसला. त्यामध्ये पिकांचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोडून पडल्यासारखी स्थिती झाली आहे. सध्या महापुराने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, त्यात शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून शेतात केलेले ठिबक सिंचन संच, खते देण्यासाठीची व्हेंच्युरी, स्क्रीन फिल्टर, सॅण्ड फिल्टर वाहून गेले आहेत. नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनांतील वैयक्तिक शेतकऱ्यांच्या उपसासिंचन योजनेच्या मोटारी वाहिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या विहिरी महापुरात मुजल्या आहेत. काही ठिकाणी त्या पडल्या आहेत. शासनाच्या आग्रहाखातर शेतकऱ्यांनी बांधावर लागवड केलेली फळपिके, सागवानासह फळझाडांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून विविध योजनांतून उभारलेली हरितगृहे, शेडनेट डोळ्यादेखत भुईसपाट झाली आहेत. अनेक नालाबांध, मातीबांध, शेततळी फुटली-तुटली आहेत. काही ठिकाणी बांधही वाहून गेले आहेत. त्यांचेही नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले. मात्र, पीक नुकसान वगळता संबंधित नुकसानीपोटी शासनाकडून संबंधितांना किती भरपाई द्यावी, यासंदर्भातील आदेशच कृषी विभागाकडे नाहीत. त्यामुळे त्यांचेही हात बांधल्यासारखी स्थिती झाली आहे. त्यामुळे शेतकरी या नुकसानीच्या मदतीपासून वंचितच राहणार आहेत. अगोदरच महापुराच्या तडाख्यातून शेतकरी सावरला नाही. त्यातच आणखी हे संकट त्यांच्यासमोर असल्याने मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी तातडीने त्यासंदर्भातील मदतीचा निर्णय घेणे गरजेचे आहे.  

भरपाई एकाच पिकाला 
शेतीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी एकाच क्षेत्रात ऊस, भुईमूग, सोयाबीन, घेवडा अशी एकत्रित पिके घेतात. त्या सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा सर्व पिकांचे वेगवेगळे पंचनामे करून त्यांना वेगवेगळी भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, पिके अनेक असली तरी एकाच पिकाला भरपाई मिळते. त्यामध्येही सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

माझ्या पाच एकर क्षेत्रातील ठिबक सिंचन संच वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी शेतजमीनही सात ते आठ इंचाने वाहिली आहे. ठिबक सिंचन संच व वाहिलेल्या जमिनीची किती मदत मिळेल, हे शासनाची ‘गाइडलाइन’च नसल्याने आम्ही सांगू शकत नसल्याचे मला प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही जर मदत मिळाली नाही तर आम्ही कर्जाच्या डोंगराखाली मरून जाऊ. मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून या मदतीचा विचार करावा.
- शंकरराव खोत, शेतकरी, वाजेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com