यहॉं मरना मना हैं...

Forbidden to die here ...
Forbidden to die here ...

नगर ः शहरात ना धड रस्ते आहेत, ना इतर पायाभूत सुविधा. जिथं चिरशांती घ्यायची, त्या स्मशानातही तीच अवस्था. नगराचे महानगर बनलेल्या या शहरासाठी अवघी एकच स्मशानभूमी आहे. त्यामुळे सगळा "लोड' तिथेच. दिवसाकाठी तेथे किमान चार ते पाच अंत्यविधी होतात. बऱ्याचदा पहिल्या मृतदेहावरील अंत्यसंस्कार उरकेपर्यंत ताटकळत थांबावे लागते. तेथे विद्युतदाहिनी आहे. मात्र, बिल न भरल्याने वीजजोड खंडित केल्याचे समजते. त्यामुळे तीही बंदच आहे. एकंदरीत, नगरकरांवर "यहॉं मरना मना हैं...' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

येथील अमरधाममध्ये एका सामाजिक संस्थेने विद्युत दाहिनी बसवून दिली आहे. मात्र, ती गेल्या महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे अंत्यविधी करण्यास अडचण येत आहे, असे नगरकर सांगतात. दुसरीकडे, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी विद्युतदाहिनी सुरूच असल्याचा दावा करतात. अंत्यविधीसाठी गेलेल्या
मृताच्या नातेवाइकांना मात्र, विद्युत दाहिनी बंद असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याची कोणी वाट पाहत नाही. वेळ लागला तरी पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. परिणामी, मृतदेहाची परवड होते.
 

महापालिका प्रशासनाकडून शहरातील खड्डे, कचरा, डेंगीची साथ, अशा अनेक प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होते. आता मरणाच्या दारातही महापालिकेला सुविधा देता येत नसल्याने नगरकर संतापले आहेत. या संदर्भात महापालिकेत विचारणा केली असता, महापालिकेचे विद्युत विभागप्रमुख 15 दिवसांसाठी रजेवर आहेत, असे सांगण्यात आले. विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत कानावर हात ठेवले. महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही, महावितरण विभागाकडून अशी कोणती कारवाई झाली नसल्याचा दावा केला.

गेल्या महिन्यातच 50 हजार रुपयांचे विद्युतदाहिनीचे वीजबिल भरल्याचे विद्युत विभागाकडून सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वी एका मृतदेहावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करायचे होते; मात्र त्या वेळी विद्युतदाहिनी बंद असल्याचे सांगण्यात आले होते.

याबाबत अमरधाममधील महापालिका कर्मचाऱ्यांना विचारले असता, "दोन दिवसांपूर्वी विद्युतदाहिनीत तांत्रिक बिघाड झाला होता. या दुरुस्तीसाठी विद्युतदाहिनी दोन दिवस बंद ठेवली,' असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेच्या विद्युतदाहिनीच्या वीजपुरवठ्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


विद्युतदाहिनीबाबतचा संपर्क क्रमांकच नाही

पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काही जण आपल्या कुटुंबातील मृत व्यक्तीचा अंत्यविधी विद्युतदाहिनीत करण्यास प्राधान्य देतात. नगरच्या अमरधाममध्येही एका सामाजिक संस्थेने विद्युतदाहिनी स्वखर्चाने महापालिकेला दिली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाला ती नीटपणे चालविताही येत नाही. जास्तीत जास्त अंत्यविधी विद्युतदाहिनीत व्हावेत, यासाठी कोणतेही प्रयत्न त्यांच्याकडून केले जात नाहीत. या दाहिनीबाबतचा संपर्क क्रमांकही महापालिकेच्या डायरीत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com