नगर - 'प्रभू रामचंद्रांच्या रावणाबरोबर झालेल्या युद्धात वानरसेनाच रामाचे सैन्य होते. रामसेनेतील सर्व वीर योद्धे अनुसूचित जमातीचे होते.
मान्यताप्राप्त वाल्मीकी रामायणात व तुलसी रामायणात हनुमान व इतर वीर योद्ध्यांविषयी "वानर', "बंदर', असाच उल्लेख आहे. रामभक्त हनुमान हेही आदिवासी गोत्राचे असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
जिल्हा दौऱ्यावर असलेले साय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय आढावा बैठक घेतली. या वेळी आयोगाच्या उपाध्यक्ष अनसूया उइके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी उपस्थित होते.
दरम्यान, नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साय यांनी पिंपळगाव माळवी तलावाची पाहणी करीत आदिवासींबरोबर संवाद साधला. साय म्हणाले, की अन्याय, अत्याचार सहन न झाल्याने काही जण नक्षलवादाकडे ओढले जात आहेत. नक्षलवादी होण्यास सरकार, प्रशासन जबाबदार आहे. नगर जिल्ह्यातील पारधी समाजातील युवकांना पोलिस प्रशासनाने पोलिस दलात भरती केले. प्रवाहात आणून परिवर्तनाच्या वाटेवर नेणारे असे उपक्रम सर्व ठिकाणी राबविले, तर नक्षलवादाला निश्चित आळा बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
|