"येथील' दुष्काळग्रस्तांची होरपळ ; नेहरूंसह यशवंतरावही गहिवरले

"येथील' दुष्काळग्रस्तांची होरपळ ; नेहरूंसह यशवंतरावही गहिवरले

सोलापूर ः आर्थिक चणचणीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना कोणत्या प्रकारचे अन्न खावे लागत होते, याचा अनुभव तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी घेतला आणि ते व्यथित झाले, गहिवरले. 

1952 मध्ये सोलापूर दौऱ्यादरम्यान या दोघांना आलेला हा अनुभव दुष्काळग्रस्तांची व्यथा सांगून गेला. या दौऱ्यात पंडितजी व यशवंतराव यांच्या व्यक्तिमत्त्वाचे, वैचारिक मोठेपणाचे अंतःकरण हेलावून सोडणारे दर्शन झाले. आज (सोमवारी) यशवंतराव यांची पुण्यतिथी. त्यानिमित्त सोलापूर शहर व जिल्ह्याशी आलेल्या त्यांच्या संबंधांविषयी थोडंसं. 

मोटारीतून उतरून केली कामगारांशी चर्चा 
दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यादरम्यान या नेत्यांची गाडी एका ठिकाणी अचानकपणे थांबली. रस्त्यापासून काही अंतरावर एका झाडाखाली 100 ते 150 कामगार जेवण करीत होते. त्या ठिकाणी नेहरू व चव्हाण दोघेही गेले. त्यांनी परचुंड्यातील एक भाकर घेतली. मात्र, ती भाकरही नव्हती आणि गव्हाची पोळीही नव्हती. हे काय आहे, असे त्यांनी विचारले. "बरबड्याची भाकरी' असे उत्तर मिळाले. याचा अर्थ न कळाल्याने पंडितजींनी जिल्हाधिकारी झुबेरी यांना विचारले. 

बरबड्याच्या भाकरीची घेतली माहिती 
दुष्काळातही माळरानावर एक प्रकारचे गवत येते. त्याला ज्या बिया लागतात, त्याला बरबडा म्हणतात. त्या दळून त्यापासून तयार केलेली ही भाकरी आहे, असे झुबेरी यांनी सांगितले. "स्वस्त धान्य दुकानात गहू मिळत नाही का?' अशी विचारणा पंडितजींनी केली. "दुष्काळी काम गावापासून 10 मैलांवर आहे. येथून 20 मैलांवर स्वस्त धान्य दुकान आहे. पैसे नसल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन धान्य खरेदी करता येत नाही. तसेच, गव्हाची पोळी करायला तेल कुठले आणायचे? हाही प्रश्‍न आहे, असे उत्तर शेतकऱ्याने दिले. 

चवही घेतली आणि तुकडा ठेवला खिशात 
दुष्काळी कामे करणाऱ्यांच्या अडचणी काय आहेत, याची माहिती यशवंतरावांनी पंडितजींना करून दिली. त्यांनी एका कामगाराच्या हातातील बरबड्याची भाकरी घेतली, चावून पाहिली व एक तुकडा खिशात ठेवला. करमाळ्यातील सभेत पंडितजींनी दुष्काळी कामे करणाऱ्यांसाठी योजना जाहीर केल्या. त्यासंबंधी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या घटनेतून पंडितजींची संवेदनशीलता, आकलन शक्ती व निर्णय घेण्याच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळे-वेगळे दर्शन जिल्हावासीयांना झाले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com