गावगाडा रुतला : जगायचे कसे, शेतीला पैसे आणायचे कुठून ?

How to live, where to bring money for agriculture?
How to live, where to bring money for agriculture?

नवेखेड  : "कोरोना' चा प्रसार व त्यातून झालेली लॉकडाऊनची स्थिती याचा फटका बोरगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील शेतकरी व उद्योगांना बसला आहे. त्यानी कुटुंबासाठी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. इथून पुढे कसे जगायचे, शेतीला पैसे कुठून आणायचे ? असे प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. 

कृष्णाकाठावरील बोरगाव. कृषी-औद्योगिक क्रांती करणारी गावे कृष्णाकाठावरील अनेक पट्टीचे शेतकरी या भागात आहेत. अलीकडे तरुणाई मोठ्या प्रमाणात शेतीत सक्रिय झाली आहे. एकरी शंभर टन उसाबरोबर भाजीपाला, इतर पिके घेण्यात शेतकऱ्यांचा हातखंडा आहे. लॉकडाऊनमुळे व्यापार थांबल्याने कवडीमोल दराने भाजीपाला विकावा लागला. काहींनी उभ्या पिकांत नांगर घातले. दुधाचा दर उतरल्याने दूध उत्पादक व व्यावसायिक अडचणीत आलेत. छोटी मोठी दुकाने बंद राहिल्याने अवलंबून असणाऱ्यांचे हाल झालेत. 

या भागातील मोठी असणारी बाजारपेठ बंद राहिल्याने लाखोंचा तोटा या व्यापाऱ्यांना सहन करावा लागला. ठिकठिकाणी झालेली सिंचनाची सोय, यातून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढलेला कल त्यातून होणारी अर्थप्राप्ती व्यवसायामधून मिळणारा नफा त्यातून पाहिलेली स्वप्ने सध्या स्वप्नेच राहिलीत. 

दोन महिने झाले तरी भारतात लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे शेतमालाला उठाव नाही. मार्केट बंद आहे. शेतकऱ्यांना डोके धरून बसायची वेळ आली. महापुरातील सावरलेल्या शेतकऱ्यांनी मिरची, भोपळा, फुलांची लागवड केली होती. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिकांना चांगला दर मिळतो. हा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव. तो "कोरोना' च्या पार्श्वभूमीवर ही स्थिती निर्माण झाल्याने शेतकामाची चक्र थांबली. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली. मागील वर्षी महापूर व अतिवृष्टीने शेतकरी, व्यावसायिकांचे कंबरडे मोडले. शासनाच्या मदतीतून काही जण सावरत असतानाच "कोरोना' च्या तडाख्याने पुन्हा तो आडवा झाला. पतसंस्था, बॅंकांच्या वसुलीवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम झाला. 

प्रत्येक कुटुंबात सदस्य संख्या वाढल्याने शेतातील कामे सकाळी व संध्याकाळी हे सदस्यच मार्गी लावत असल्याने मजूरांची कामे सध्या कमी झालीत. ग्रामपंचायतीमार्फत होणारी विकासकामे बंद आहेत. वाहतूक बंद झाल्याने छोट्या मोठ्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची अडचण झाली आहे. एकूणच लॉकडाऊनमुळे गाव गाडा ठप्प झाला. तर विकासाचा रथही रुतला आहे. 

कर्जाऐवजी आर्थिक मदतीचा विचार करावा

लॉकडाऊनमुळे झालेल्या भाजीपाला व इतर पिकांच्या नुकसानीचा विचार करून शेतकऱ्याची कर्जे माफ करावीत. छोट्या व्यावसायिकांना कर्जाऐवजी आर्थिक मदतीचा विचार सरकारने करावा. तरच हा गावगाडा रुळावर येण्यास मदत होईल.

- माणिकराव पाटील, माजी अध्यक्ष, राज्य सहकारी बॅंक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com