अनधिकृत पार्सल सेवा अधिकृतपणे बंद!

Railway
Railway

कोरेगाव - सातारा रेल्वे स्थानकाच्या स्थापनेपासून स्थानकातून सुरळीतपणे सुरू असलेली प्रवासी गाडीमधील अनधिकृत मालवाहतूक (पार्सल) सेवा अचानक अधिकृतपणे बंद करण्यात आल्याने उद्योगपती, व्यापारी, शेतकरी, व्यावसायिक, सर्वसामान्यांसह सैन्यदलातील सैनिकांची गैरसोय सुरू झाली आहे. ही सेवा बंद झाल्यामुळे सर्वांना मानसिक त्रासासह आर्थिक झळ बसत आहे.

क्षेत्र माहुली (ता. सातारा) येथे सातारा रेल्वे स्थानक सुरू झालेल्याला आज सुमारे ५० वर्षे होत आली आहेत. रेल्वे स्थानक सुरू झाल्यापासून येथून व्यापाऱ्यांचा माल, शेतकऱ्यांचे डाळिंब, आले, फुले, कांदा आदी शेती उत्पादनांसह सर्वसामान्यांचे जीवनावश्‍यक साहित्य, दुचाकी, सैन्य दलातील सैनिकांच्या दुचाकी, मोठमोठ्या बॅगा आदी साहित्य मालाची भाडेपावती देऊन वाहतूक केली जात असे. त्यामुळे शेतकरी वर्गाचा माल कमी वेळेत बाजारपेठेत पोचून चांगला भावही मिळत असे. व्यापारी, नागरिकांची चांगली सोय होत होती. 

सातारा रेल्वे स्थानकातून ही पार्सल सेवा विनातक्रार सुरू होती. सर्व घटकांची चांगली सोय होत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ही पार्सल सेवा कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आली आहे. स्थानकात पार्सल कार्यालयाच्या जागी एक उपहारगृह सुरू झालेले दिसत आहे. सातारा स्थानकातून बाहेर पार्सल जात नसले तरी बाहेरून आलेले पार्सल मात्र, उतरवून घेतले जात असल्याचे दिसत आहे. 

सातारा रेल्वे स्थानकातून पार्सल सेवा बंद झाल्यामुळे व्यापारी वर्ग, नागरिक, शेतकऱ्यांना आपला सर्रास माल रस्ते मार्गाने मालट्रकद्वारे पाठवावा लागतो आहे. त्यात रेल्वेच्या तुलनेत भाडेखर्च वाढतो आहे. माल पोचण्यातही जादा वेळ जात आहे. किंवा मग हा माल मालट्रकद्वारे मिरज किंवा पुण्याला नेवून तेथील रेल्वे स्थानकातून पुढे इच्छितस्थळी पाठवावा लागत आहे. त्यातही भाडेखर्च व वेळ वाढतो आहे. मालाची वाहतूक करणेही गैरसोयीचे होत आहे. शेतीमालाची दोन-दोन वेळा चढउतार करताना नुकसानही होत आहे. शेतकरी वर्गाला प्रचंड मनस्तापही सहन करावा लागत आहे.

दरम्यान, पार्सल सेवा बंद झाल्याबाबत स्थानकातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानकात एकही प्रवासी वाहतूक गाडी पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ थांबत नाही. पार्सल सेवेसाठी वेगळा अधिकार, कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला नाही. तरीही पार्सल सेवा सुरू होती. त्यातच गेल्या काही वर्षामध्ये पूर्वीचे बरेच अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत, काही बदलून गेले आहेत. नवीन आलेले लोक पार्सलची जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पार्सल सेवा पूर्णतः बंद करण्यात आली आहे. मुळात जी पार्सल सेवा दिली जात होती, ती खरे तर अधिकृत भाडेपावती देऊन केली जात होती तरी ती रेल्वेच्या लेखी अनधिकृतच होती. मात्र, ती लोकांच्या सोयीसाठी चालवली जात होती. आता मात्र, ही सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे.

सातारा रेल्वे स्थानकामधून ५० वर्षांपासून व्यापारी, शेतकरी मालाची अधिकृतपणे भाडे घेऊन पार्सल सेवा सुरळीत सुरू होती. त्यामुळे सर्वांची चांगली सोय होत होती. ही पार्सल सेवा पुन्हा तातडीने सुरू करावी. याबाबत आपण मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे ‘डी. आर. एम.’ ना निवेदन पाठवले आहे.
- बाबूराव काटकर, सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती, पुणे विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com