"गोकुळ'ला नव्हे आता डोंगळेनाच धक्का 

"गोकुळ'ला नव्हे आता डोंगळेनाच धक्का 

कोल्हापूर - विधानसभेची निवडणूक जवळ आली की अरुण डोंगळे यांना काही तरी वेगळेपण दाखवण्यासाठी जुनी सवयच आहे. त्यांनी त्याच पार्श्‍वभूमीवर आता गोकूळ मल्टिस्टेट विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे "गोकुळ'ला काडीचा धक्का लागणार नाही. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे त्यांचे राजकीय अस्तित्वच संपलेले असेल, अशा शब्दात "गोकूळ'चे नेते महादेवराव महाडिक यांनी "सकाळ' शी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते म्हणाले, विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन डोंगळेनी बदललेली त्यांची भूमिका त्यांचा पुढच्या राजकीय वाटचालीत अडचणीची ठरेल. आता आम्ही गोकूळच्या निवडणुकीत राधानगरीला एकूण तीन जागा देणार आहोत. 

अरुण डोंगळे यांनी मल्टिस्टेटबद्दल घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे सांगून श्री महाडिक म्हणाले, गोकूळ मल्टिस्टेट करण्याच्या घडामोडीत डोंगळे सक्रीय होते. सर्वसाधारण सभेत ठराव मंजुर व्हावा म्हणूनही ते पुढे होते. पण आता अचानक त्यांनी पवित्रा बदलला आहे. त्यांच्या या भुमिकेमुळे गोकूळला मोठा धक्का बसेल असे त्यांना वाटले असावे. पण गोकूळला धक्का द्यायची ताकद डोंगळे यांच्यात नाही. उलट गोकूळमुळेच डोंगळेना ताकद होती हे ते विसरून गेले आहेत. 

ते म्हणाले, त्यांच्या भुमिकेचे वृत्त आज आम्हाला कळल्यानंतर मी, पी.एन.पाटील व ज्येष्ठ संचालकात चर्चा झाली. आम्ही म्हटले ते जातात तर जाऊ देत. पी. एन. पाटील व मी गोकूळच्या विकासासाठी झटत आहोत. काही जण सोडून गेलेले क्षण आम्हाला माहिती आहेत. पण गोकूळ सोडून गेलेल्यांचे आजवर नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे गोकूळचे एक टक्काही नुकसान झालेले नाही. कारण दूध उत्पादकांचा खंबिर विश्‍वास आमच्या पाठीशी आहे. 

गोकूळ मल्टीस्टेट का करणे गरजेचे आहे हे डोंगळे यांना माहिती होते. ते या प्रक्रियेत पुढे होते असे सांगून महाडिक म्हणाले, एका बाजुला मल्टिस्टेटच्या बाजूने बोलायचे व आपणच दूध उत्पादकांचा हितकर्ता असे समजून अचानक युटर्न घेण्यामागचे कारण आगामी विधानसभा आहे. डोंगळे यांना विधानसभेला दहा, पंधरा हजाराहून अधिक मते मिळणार नाहीत. एवढेच नव्हे तर गोकूळचा आधार सुटला तर त्यांना राजकारणात ही फारसा आधार राहाणर नाही. डोंगळे यांनी कोणाच्या तरी बदसल्ल्यातून आत्मघातकी भूमिका घेतली आहे. आता त्यांना त्यांची खरी किंमत काय ते कळणार आहे. 

पी. एन. पाटील, मी, सर्व संचालक व गोकूळच्या पाठीशी असलेले गावोगावचे कार्यकर्ते यामुळे गोकुळचे भवितव्य उज्वल असल्याचे श्री महाडिक यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, मल्टिस्टेटमुळे सांगली जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातलेच सभासद अधिक केले जातील असला बिनबुडाचा आरोप होत आहे. मल्टीस्टेटच्या यादीच कोल्हापूर जिल्हा व कर्नाटकातील काही गावांचाच समावेश आहे. 

डोंगळे यांचा कल गोकूळच्या उलटा असेल तर त्यांनी जरूर राजिनामा देऊन बाजूला व्हावे. आमदारकीची स्वप्ने पडू लागल्यानंतर गोकूळला विसरायचे हे डोंगळे यांचे नाट्य इथ उत्पादक सभासद काधीही मान्य करणार नाहीत. मल्टीस्टेटला विरोधच होता तर मल्टीस्टेट होण्यात त्यांनी पुढाकार का घेतला हे एकदा त्यांनी दूध उत्पादकांना सांगावे.   
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com