जोशी, शेट्टी ते खोत इतिहास फुटीचाच 

जोशी, शेट्टी ते खोत इतिहास फुटीचाच 

कोल्हापूर - चळवळ मग ती शेतकऱ्यांच्या प्रश्‍नात उभी राहिलेली असो किंवा अन्य कोणत्याही प्रश्‍नावर त्यात फुटीची बीजे ही रोवलेलीच असतात. शेतकरी संघटनेचा गेल्या 15-20 वर्षांतील इतिहास पाहिला तर शेतकरी प्रश्‍नांवर मोठे झालेले नेते सत्तेसोबत गेल्यानंतर संघटनेतील ही गटबाजी आणि त्यातून फूट पडलेली दिसून येते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावरून हा इतिहास कायम असल्याचे दिसत आहे. 

वीस वर्षांपूर्वी देशपातळीवर सनदी अधिकारी म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली एकच शेतकरी संघटना होती. सध्याचे "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, सदाभाऊ खोत हे पश्‍चिम महाराष्ट्रातील या संघटनेचे शिलेदार होते. मराठवाडा, विदर्भात संघटनेचा झेंडा लक्ष्मण वडले, महिला आघाडीच्या डॉ. शोभाताई वाघमारे यांच्या खांद्यावर होता. श्री. जोशी यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला; पण श्री. शेट्टी यांना हा निर्णय आवडला नाही. जातीयवादी पक्षांसोबत जाणारे शेतकरी नेतृत्व कधीही शेतकऱ्यांचे नसते, असे सांगत श्री. शेट्टी यांनी "स्वाभिमानी' शेतकरी संघटनेची स्थापना पश्‍चिम महाराष्ट्रात केली. 

या काळात रघुनाथदादा पाटील व शरद जोशी यांच्यात मतभेद झाले आणि श्री. पाटील यांनी स्वतःच्या नेतृत्वाखालील आणखी एक संघटना काढली. "स्वाभिमानी'त मात्र श्री. शेट्टी व सदाभाऊ हे दोघेच नेते राहिले. श्री. वडले, डॉ. वाघमारे दहा-बारा वर्षांत कोठे आहेत, याचा पत्ता नाही. 

शरद जोशी यांच्या भाजपच्या पाठिंब्याला विरोध करणारे श्री. शेट्टी 2014 मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत राहिले. याची बक्षिसी म्हणून राज्यात त्यांच्या संघटनेला राज्यमंत्री पद बहाल केले. या पदावर श्री. खोत यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून शेट्टी-खोत यांच्यातील मतभेद सुरू झाले. अलीकडे ते चव्हाट्यावरच आल्यासारखी परिस्थिती आहे. शेतकरी प्रश्‍नावर सरकारला सळो की पळो करून सोडणारे हे दोन नेते कधी एकमेकांवर तुटून पडतील याचा अंदाज नाही, एवढे टोकाचे मतभेद या दोघांत निर्माण झाले आहेत. सरकारच्यादृष्टीने ही जमेची बाजू आहे. संघटना कोणतीही असली तरी त्यात फूट पडली की ताकद कमी होते. म्हणून राज्यकर्त्यांनीही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या श्री. शेट्टी यांच्याकडे दुर्लक्ष करून श्री. खोत यांना जवळ करायला सुरवात केली. श्री. खोत यांचे पुत्र सागर हे भाजपमध्ये लवकरच जाणार असल्याची चर्चा सुरू असतनाच आता स्वतः श्री. खोत हेच भाजपत जाणार हे निश्‍चित झाल्याचे म्हटले जाते. भाजपनेही यानिमित्ताने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. श्री. खोत यांच्या रूपाने शेतकरी, ग्रामीण चेहरा पक्षाला मिळवण्याचा प्रयत्न करताना श्री. शेट्टी यांना पश्‍चिम महाराष्ट्रातून मिळणारी रसद रोखता येईल, असा भाजपचा डाव आहे. यातून शेतकरी, त्यांचे प्रश्‍न व त्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांत मात्र अस्वस्थता आहे. 
 

पश्‍चिम महाराष्ट्रात जनाधार 
पश्‍चिम महाराष्ट्रात श्री. शेट्टी यांना चांगलाच जनाधार मिळाला. त्यांची आक्रमक भाषणे, सरकारवर तुटून पडण्याची प्रवृत्ती आणि परिणामाची चिंता न करता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई करण्याची पद्धत यामुळे ते अल्पावधीच लोकप्रिय झाले. या जोरावरच ते जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार झाले, आमदारकीचा कार्यकाल शिल्लक असताना खासदार झाले. "स्वाभिमानीची' शेट्टी-खोत ही जोडी म्हणजे "सर्जा-राजा' ची जोडी असे महाराष्ट्रभर ओळख झाली. 

चळवळीतील नेते सत्तेसोबत 
एखाद्या चळवळीची ताकद कमी करायची असेल तर त्यात फूट पाडणे हे राज्यकर्त्यांचे काम असते. शरद जोशी यांना भाजपासोबत घेताना त्यांना राज्यसभा सदस्य केले. जिल्हा परिषदेत दहा वर्षे श्री. शेट्टी यांची संघटना कॉंग्रेससोबत होती. राज्यात परिवर्तन झाले आणि चळवळीतील नेते सत्तेसोबतचा इतिहास श्री. शेट्टी, खोत यांच्या रूपाने कायम राहीला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com