मी मोदींचा समर्थक; मनुवादाचा नाही - रामदास आठवले

कऱ्हाड - मैत्री परिषदेत रामदास आठवले यांना कुऱ्हाड भेट देताना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे. त्या वेळी सौ. पुष्पलता सकटे, जावेद नायकवडी, प्रकाश वायदंडे, अशोक गायकवाड आदी.
कऱ्हाड - मैत्री परिषदेत रामदास आठवले यांना कुऱ्हाड भेट देताना प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे. त्या वेळी सौ. पुष्पलता सकटे, जावेद नायकवडी, प्रकाश वायदंडे, अशोक गायकवाड आदी.

कऱ्हाड - दलित, आदिवासी व ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का न लावता 50 टक्‍क्‍यांपैकी 25 टक्‍क्‍यांमध्ये मराठासह अन्य जातींना आरक्षण द्यावे, असा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दिला आहे. त्यासाठी प्रयत्नशीलही असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यास राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. मी मोदींचे समर्थन करणारा असलो, तरी मनुवादाचे समर्थन करणारा नाही, असेही त्यांनी नमूद केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात दलित महासंघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित मैत्री परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे अध्यक्षस्थानी होते. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आण्णा वायदंडे, किशोर तपासे, पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती सौ. माया भोसले, सौ. पुष्पलता सकटे, माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, विजय यादव आदी उपस्थित होते.

श्री. आठवले म्हणाले, 'मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात लाखोंच्या संख्येने काढलेले शिस्तबद्ध मोर्चे कौतुकास्पद आहेत. वास्तविक 50 टक्के आरक्षणापैकी आदिवासी, दलित, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित 25 टक्‍क्‍यांमध्ये मराठासह ब्राह्मण तसेच अन्य जातींना आरक्षण द्यावे, यासाठीचा प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे दिला आहे. त्यास कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. भाजपला जातीयवादी म्हणत आपण मागे राहिलो. मात्र मी पुढे गेलो. 125 कोटींच्या जनतेच्या विकासाची भूमिका ते मांडत असले, तरी लगेच परिवर्तन होणार नाही. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्यामुळे मातंग समाज जागृत झाला. तरुण रस्त्यावर उतरत आहेत. ते जातीयवाद्यांना रुचत नाही. त्यासाठी मच्छिंद्र सकटे आपल्यास एकत्र यावे लागणार आहे. बौद्ध व मातंग समाजाने आपसातील मतभेद बाजूला ठेवून डॉ. आंबेडकरांनी सांगितलेल्या सामाजिक, आर्थिक न्यायासाठी एकत्र आले पाहिजे.''

ते म्हणाले, 'मी मोदींचे समर्थन करणारा असलो, तरी मनुवादाचे समर्थन करणारा नाही. जातीयवाद संपला पाहिजे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी स्वत:चे मूल्य वाढवण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व आण्णा भाऊ साठे यांच्या विरोधात मोदी सरकारने भूमिका घेऊन संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास मी सरकारमध्ये राहणार नाही.''

या वेळी प्रा. सकटे, श्री. गायकवाड, महासंघाचे जिल्हाध्यक्ष जावेद नायकवडी यांची मनोगते झाली. हरिश बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले.

राज्य सरकारला धोका नाही
आठवले म्हणाले, 'दसऱ्याला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढणार का हे माहिती नाही, मात्र, जरी शिवसेनेने पाठिंबा काढला, तरी फडणवीस सरकार राहिलेला कार्यकाल पूर्ण करेल, असा विश्‍वास आहे. शिवेसना पाठिंबा काढणार नाही, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com