निपाणी : काही दिवसांवर आलेल्या खरीप हंगामाच्या कामाला निपाणी तालुक्यातील शेतकरी लागला आहे. सध्या मशागतीची कामे सुरु असून येणाऱ्या हंगामात त्याला बी-बियाणे, खते व किटकनाशके घ्यावी लागणार आहेत. मात्र त्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाली आहे. परिणामी खरीप हंगामाचा खर्च २५ ते ३० टक्के वाढणार आहे. निपाणी तालुक्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन १ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
तर इतर पिक क्षेत्रात दरवर्षीप्रमाणे घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खरिपात पेरण्यात येणाऱ्या सोयाबीन बियाण्याच्या प्रती पॅकेटमागे दर वाढ झाल्याने खर्चात वाढ होणार आहे.
मिश्रित खतांसह किटकनाशकांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यासाठी आता शेतकरी पैशाच्या जुळवा-जुळवीच्या व मशागतीच्या कामाला लागला आहे. मशागतीचा खर्च, मजुरी वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून तणनाशक फवारणी सुरु केली आहे. तणनाशकाचे भाव 300 रुपये प्रतिलिटर होते. ते आता ४८० रुपये झाले आहेत. या वाढलेल्या किंमतीचा प्रभाव शेतकऱ्यांच्या खर्चावर होणार आहे.
शेतकरी नियोजनात व्यस्त
ऐन हंगामात साठेबाजी होत असल्याने शेतकऱ्यांना भरमसाठ किंमतीत बियाणे, खते, किटकनाशके विकत घ्यावी लागतात. कधी आवश्यक असलेली खते सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यात बोगस बियाण्यांची भर पडते. त्यामुळे शेतकरी या खरीप हंगामासाठी आवश्यक त्या प्रकारची बियाणे, किटकनाशके, खते आदींच्या नियोजनात आतापासूनच व्यस्त दिसून येत आहे.
'भविष्यात तरुण शेतकऱ्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. जैविक शेतीमुळे मानवी जीवनाला खूप मोठे फायदे होतील. किटकनाशक वापरत असल्याने अनेक रोगाला सामोरे जावे लागत आहे. जैविक पद्धतीचा वापर वाढल्यास रासायनिक खतांच्या किंमती आपोआप कमी होतील.'
-नितीन नेपिरे,शेतकरी, यमगर्णी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.