तरुण अडकले मलेशियाच्या जेलमध्ये

तरुण अडकले मलेशियाच्या जेलमध्ये

कोल्हापूर - नोकरीसाठी मलेशियामध्ये गेलेल्या राज्यातील काही तरुणांना ‘वर्किंग व्हिसा’ नसल्यामुळे अटक करून जेलमध्ये ठेवले आहे. याबाबत काहींचे पालक आजही अनभिज्ञ आहेत. अटक केलेले संबंधित तरुण राहत असलेल्या हॉटेलमधील नेपाळच्या काही तरुणांनी ही माहिती कऱ्हाडमधील एका तरुणाच्या नातेवाइकांना दिली. त्या नातेवाइकांनी सांगली, साताऱ्यापासून मुंबईपर्यंत धावाधाव केली; मात्र त्यांना कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. या प्रकरणातील मुख्य एजंट सांगली जिल्ह्यातील असून, तो अद्याप मोकाट आहे.  

याबाबत मिळालेली माहिती अशी - कऱ्हाड (जि. सातारा), अक्कलकोट आणि मंगळवेढा (जि. सोलापूर), कर्जत (जि. नगर) आणि जळगाव अशा चार जिल्ह्यांतील काही तरुणांना वर्किंग व्हिसाची मुदत संपल्यामुळे मलेशियात अटक झाली आहे. अटक झालेल्या तरुणांकडे असलेली कागदपत्रे बनावट असल्याचीही माहिती पुढे येत आहे. कऱ्हाड आणि सांगलीतील दोघा एजंटांकडून या तरुणांची फसवणूक झाली आहे. हॉटेलात काम करण्यासाठी या सर्वांना महाराष्ट्रातून नेण्यात आले. यासाठी काही जणांकडून सव्वा ते दीड लाख रुपये घेण्यात आले. ‘ट्रॅव्हल्स व्हिसा’ आणि ‘वर्किंग व्हिसा’ हे दोन प्रकार आहेत. त्यातील वर्किंग व्हिसा संपल्यामुळे मलेशियातील पोलिसांनी या तरुणांना थेट राहत असलेल्या त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून उचलून नेल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.

कोल्हापूर आणि अककलकोट (जि. सोलापूर) मधील दोन तरुण अद्याप मलेशियात आहेत. त्यांच्याकडील ट्रॅव्हल व्हिसाची मुदत संपलेली आहे. त्यांच्याकडील ‘वर्कर्स व्हिसा’ची तारीख पुढील महिन्यातील आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

कोल्हापुरातील तरुणांच्या पालकांनी येथील पोलिसांकडे धाव घेतली; मात्र त्यांनी तांत्रिक मुद्दे उपस्थित करून परत पाठवून दिले. कऱ्हाडमधील अटक झालेल्या तरुणांच्या नातेवाइकांनी स्थानिक पोलिसांसह मुंबईतील दूतावास कार्यालयाकडेही या प्रकाराची माहिती दिली आहे. ‘पोलिस ठाण्यात फिर्याद द्या; कागदपत्रे तपासून पाहूया, नंतर त्यांना परत आणूया,’ असा सल्ला मुंबईतील कार्यालयातून मिळाला आहे. त्यामुळे नातेवाइकांना काय करायचे हे सुचत नाही.

कऱ्हाडच्या तरुणाच्या नातेवाइकांनी आज सांगलीतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. कऱ्हाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची विनंती त्यांनी केली आहे. सायंकाळी सांगली शहर पोलिस ठाण्यात त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यात आल्याचेही नातेवाइकांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी
अटक झालेल्या तरुणांबरोबर संपर्क साधण्याचे कोणताही मार्ग दिसत नसल्यामुळे नातेवाइकांची चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी या नातेवाइकांनी मागणी केली आहे.

एजंटांकडूनही ताकतुंबा 
‘मल्टीपल एन्ट्री व्हिसा’ हा भारतीय तरुणांना दिला आहे, तोच बनावट कागदपत्रांद्वारे तयार केला असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी कऱ्हाडमधील एजंटाकडून माहिती घेतली. त्यानंतर या नातेवाइकांनी दावा केला, की त्या एजंटाने कागदपत्रे खोटी असल्याचे तोंडी सांगितले आणि सांगलीतील मुख्य एजंटाकडे जावा, असाही सल्ला दिला. 

मलेशियात २२ दिवस कारागृहात 
चारही तरुणांना २२ दिवसांपूर्वी अटक झाली आहे. ते सध्या कारागृहात आहेत. त्यांच्या मित्रांनी ही माहिती आम्हाला दिलेली आहे. त्यांना ज्या एजंटांनी पाठविले, त्यांच्याकडे चौकशी केली असता सर्वच कारभार संशयाचा वाटत आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांसह मुंबईतील दूतावासाकडेही धाव घेतली आहे; मात्र काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र असल्याचे अटक असलेल्या तरुणाचे एक नातेवाईक नामदेव कुंभार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

नोकरीसाठी फसले; वर्किंग व्हिसा संपला
सातारा, सोलापूर, नगरच्या तरुणांचा समावेश
कोल्हापूरचे तरुण सुरक्षित; एजंट कऱ्हाड-सांगलीतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com