चिंचेचं नाव काढताच तोंडाला पाणी सुटलं नाही असा मनुष्य विरळच. लहानपणी अनेकांची उन्हाळी सुटी चिंचेच्या झाडाखाली गोड झाली असेल. समस्त महिलावर्ग तर चिंचेच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो. प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान मिळवून समृद्ध झालेल्या चिंचेचे बाजारपेठेतील गणित मात्र गरीब म्हणावं इतकं वाईट आहे. "गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली,' असाच काहीसा दृष्टिकोन चिंचेच्या अर्थकारणाबाबत वाढीस लागलेला आहे.
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तग धरून असलेली चिंचेची झाडे वन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी मालकीची आहेत. मार्च ते मे महिन्यापर्यंत चिंचेचा हंगाम असतो. हंगामाच्या प्रारंभी झाडांचा लिलाव होतो. निसर्गाच्या कृपेने बहरेल तेवढी चिंच बडवून ठेकेदार व्यापाऱ्यांना विकतात. जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग नसल्याने व्यापारीही माल परपेठेत विकून रिकामे होतात.
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार टन चिंचेचे उत्पादन होते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनमुळे चिंचेचाही बाजार ठप्प आहे. साधारण अडीच हजार टन मालच बाहेरील बाजारात गेला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी बहुतांश माल कोल्डस्टोअरेजला ठेवला आहे.
एकूणच, चिंचेकडे आपण काही पैसे देणारे पीक म्हणून गांभीर्याने पाहत नाही आहोत. चिंचेकडे पीक म्हणून पाहिले जात नसल्याने या झाडांची व्यावसायिकदृष्ट्या लागवड झालेली नाही. आहेत ती निसर्गतः वाढलेली झाडेही सध्या अनुत्पादक म्हणून गणली जाऊन तोडली जात आहेत. त्यामुळे चिंचेच्या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. याला पायबंद घालण्याची गरज आहे.
हे पण वाचा - कलिंगडची जेली, बीटचा पाव अन् मक्याचे कटलेट...
सध्या चॉकलेट, इसेन्स, जेली, सॉस अशा रूपात चिंच बाजारात उपलब्ध आहे. शिवाय रोजच्या जेवणातील वापरासाठी चिंचोके काढून स्वच्छ केलेली चिंच लागतेच. चिंचोक्यांचा उपयोग स्टार्च तसेच कुंकू तयार करण्यासाठी केला जातो. ही बाजारपेठेची गरज भागविण्यासाठी जिल्ह्यात प्रक्रिया उद्योगांची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण उत्पादन पाहता मोठ्या उद्योगांना हे काम वर्षभर चालविणे शक्य नाही; पण उद्यमशील तरुण, बचत गटांच्या माध्यमातून चिंचेवर प्रक्रिया करून उत्पादने बाजारात आणणे शक्य आहे. यासाठी त्यांना उत्पादन निर्मितीपासून वितरणाची घडी बसवून देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, चिंचेच्या बाजाराबाबत व्यापारी मल्लिकार्जुन बेल्लद म्हणाले, ""सध्या झाडावर चढून चिंचा पाडायलाही कामगार मिळेनात. कर्नाटकातील लोक खेडोपाडी फिरून माल घेऊन जात आहेत. त्यामुळे बाजार कर्नाटकाच्या हातात गेला आहे. वर्षभर प्रोसेसिंग चालेल इतका कच्चा माल उपलब्ध होत नसल्याने प्रक्रिया उद्योगाला मर्यादा आहेत.''
कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.