
जयसिंगपूर (कोल्हापूर) : लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २५०० उद्योजकांसह १ लाख ३० हजार कामगारांवर उद्योग विश्वातील प्रतिकूल बदलांमुळे चिंता व्यक्त करण्याची वेळ आली आहे. अर्थकारणाला गती देण्यासाठी केंद्राच्या पातळीवर उद्योग सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्या तरी वाहन आणि टेक्स्टाईलमधील उद्योजकांना उद्योग टिकविण्यासाठी किमान सहा महिने तरी संघर्ष करावा लागणार आहे. कर्जावरील व्याज माफी, आणि वीज दरात सवलत देऊन शासनाने उद्योगांना बळ देण्याची मागणी उद्योजकांची आहे.
नोटाबंदीनंतर सातत्याने उद्योगांनी चढउतार अनुभवला आहे. मध्यंतरी वाहन उद्योगाने मंदी झटकून काहीशी उभारी घेतली होती. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनने पुन्हा या उद्योगाची चाके मंदीत रुतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लॉकडाऊनच्या काळातही कामगारांना पगार देण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत. मार्च महिन्यात बँकाकडून वसुलीचा तगादा सुरु होता. मात्र, लॉकडाऊनमुळे बँकांनी काहीशी नरमाईची भूमिका घेतली. कामगारांचा पगार, कर्जावरील वाढते व्याज, झालेले नुकसान आणि भविष्यातील अंदाज घेऊन आज उद्योजकांसह कामगारांपुढे चिंतेचे वातावरण आहे.
उद्योगांपुढे अडचणी; व्याज माफी, सवलतीच्या वीजेची गरज
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये वाहन उद्योगाशी निगडीत छोटे मोठे उद्योग अधिक प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडे चार पैसे आले तर सर्वच उद्योगांमध्ये तेजीचे वातावरण असते. ऊस पिक वगळता सर्वच पिकांचे ‘मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर उसाचीही कोट्यवधी रुपयांची येणे बाकी असल्याने वाहन उद्योगाशी निगडीत उद्योग आणखी किती दिवस चणचणीत जातील याचा नेमका अंदाज बांधणे कठीण बनले आहे. एकूणच, उद्योजक आणि कामगारांपुढे आता चिंता जाणवत आहे.
दृष्टिक्षेपात उद्योग (कोल्हापूर जिल्हा)
* शासकीय औद्योगिक वसाहती .......... ३
* खासगी सहकारी ........................... ५
* फाउंड्री उद्योग ............................... २४०
* लहान मोठे उद्योजक ....................... २५००
* कामगारांची संख्या .......................... १.३० लाख
मंदीनंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उद्योजकांपुढे अडचणींचा डोंगर उभा आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनानेच आता पुढाकार घेण्याची गरज आहे. उद्योग संपले तर बेरोजगारी वाढेल. उद्योगांना चालना देण्याची भूमिका शासनाची असली पाहिजे. यासाठी त्यांच्या अडचणी समजून त्यातून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय आहे.
-डॉ. अशोकराव माने (अध्यक्ष, शाहू औद्योगिक वसाहत, मौजे आगर)
कर्जाशिवाय उद्योग उभे राहू शकत नाहीत. महापूर, नोटाबंदी यानंतर लॉकडाऊनचे विघ्न आले आहे. सुमारे दिड महिना उद्योग बंद असल्याने कामगारांचे पगार, कर्जावरील व्याज आदींची जुळवाजुळव करताना उद्योजकांच्या नाकी नऊ येत आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी उभारी घ्यायची असेल तर आता शासनानेच उद्योजकाच्या व्यथा जाणून त्या सोडविणे गरजेचे आहे.
-दिलीप पाटील-कोथळीकर (माजी अध्यक्ष, ल.क.अकिवाटे औद्योगिक वसाहत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.