
कोल्हापूर : अपुरा पाणीपुरवठा, सेंद्रिय आणि रासायनिक खतांची कमी मात्रा, अपेक्षित मशागतीचा अभाव, जोरदार पाऊस आणि पुराचा फटका, सातत्याने एकच पीक आणि उसाला तोडणीला उशीर यामुळे जिल्ह्यात उसासह इतर पिकांच्या एकरी सरासरी उत्पादनात घट होत आहे. तर अवकाळी पावसाच्या फटक्याने रब्बीच्या उत्पादनातही घट झाली आहे. उसाचे एकरी किमान 50 ते 55 टन उत्पन्न मिळत होते. सध्या हा रेशो 40 ते 45 टनापर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे पीक घेतले जाते; पण तीन ते चार वर्षांत उसाच्या सरासरी उत्पादनात घट होत आहे. याला काही प्रमाणात निसर्ग आणि शेतकरी जबाबदार आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यात अपेक्षित आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही. तर दुसरीकडे पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घटत आहे. यशिवाय, शेतीला पोषक आणि पूरक असणारी सेंद्रिय खते दिली जात नाहीत.
जिल्ह्यात 8 ते 10 टक्के शेतकरी प्रत्येक वर्षी शेतात शेणखत किंवा इतर सेंद्रिय खत देतात. रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महाग किमतीच्या खतांचे लिंकिंग असते. ते परवडत नाही म्हणून शेतकरी रासायनिक खते कमी प्रमाणात देतात. सोयाबीन किंवा इतर कडधान्यांना पावसाचे प्रमाण कमी लागते. पण तीन वर्षात जिल्ह्यात एकसारखा आणि मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे ज्वारी, बाजरी, सोयाबीनसह इतर कडधान्यांच्या उत्पादनात घट होत आहे.
दृष्टिक्षेपात
* जिल्ह्याचे 7 लाख 76 हजार 300 हेक्टर भौगोलिक क्षेत्र
* खरीप हंगामासाठी 3 लाख 94 हजार हेक्टरवर पीक
* 1 लाखाहून अधिक हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक
जोरदार पाऊस, पुरासह हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे पिकांच्या उत्पादनात घट दिसून येत आहे. दरम्यान, ऊस तोड झाल्यानंतर याची विस्तृत माहिती घेऊन किती घट झाली, याबाबत अधिकृत आकडा समोर येऊ शकतो.
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिकारी, कोल्हापूर.
तीन ते चार वर्षात ज्या ठिकाणी 50 टनापेक्षा जास्त ऊस घेतला होता, आता त्याच शेतात पाऊस, ऊन, खतांच्या अभावामुळे उसाचे उत्पादन 40 टनापर्यंत खाली आले. पूर आणि अतिवृष्टीमुळे नदीकाठच्या शेतात तर हे प्रमाण 25 ते 30 टनापर्यंत खाली आले. एकरी जेवढा खर्च करावा लागतो, तो करतो. तरीही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
- बाबूराव पाटील, शेतकरी
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.