पंचगंगेची खोली, रुंदी वाढवू ; आदित्य ठाकरे
पंचगंगेची खोली, रुंदी वाढवू ; आदित्य ठाकरेsakal

पंचगंगेची खोली, रुंदी वाढवू ; आदित्य ठाकरे

प्रदूषणमुक्तीसाठी निधी; वस्त्यांपाशी भिंती

कोल्हापूर : पूररेषा निश्‍चित करून पंचगंगेतील नदीतील गाळ काढून खोली वाढवू. नदी पात्राच्या रुंदीकरणासह लोकवस्तीच्या ठिकाणीच सिमेंट कॉंक्रिटच्या भिंती उभारून पूरस्थिती कमी करण्याचा प्रयत्न करू. नदीत आणि रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी, रासायनिक पाणीसह प्रदूषण करणाऱ्या घटकांचे उगमस्थान शोधू. पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्याला अपेक्षित सर्व निधी दिला जाईल, अशी ग्वाही पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

श्री. ठाकरे पर्यावरणपूरक राज्यासाठी दौरे करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘माझी वसुंधरा अभियान राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. अभियानांतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे. मोठी जनजागृती करावी. स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, तरुण, ज्येष्ठ लोकांनाही पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करावेत. मी स्वत: पर्यटन आणि पर्यावरणाचा अभ्यास करतो. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये चांगले काम सुरुरू आहे.’’

जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर ते म्हणाले, ‘‘शहर, गाव नदीच्या बाजूला वसलेले असते. तेथील नद्यांना नाल्याचे स्वरूप येते; पण आता हे होऊ देणार नाही. रंकाळा, पुण्यातील मुळा- मुठा प्रदूषण मुक्तीसाठी काम केले जात आहे. त्याचा प्रकल्प आराखडाही तयार आहे. त्यानुसार त्याला निधीही दिला जाणार आहे. पर्यावरणासाठी आंदोलकर्त्यांचीही मते जाणून घेतली जातील. त्यांच्याकडील चांगल्या उपायांचा अवलंब केला जाईल.’’यावेळी उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार ऋतुराज पाटील, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होते.

प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई

नदी मिसळणारे गटाराचे किंवा उद्योगाचे पाणी थांबवाचे कसे, यावर सूक्ष्म अभ्यास केला जात आहे. पंचगंगेत मिसळणारे पाणी कशामुळे प्रदूषित होते, याचा प्रारूप आराखडा तयार आहे. त्यानुसार नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी लागणारा सर्व निधी देण्याची तयारीही असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. उद्योजकांकडून प्रदूषण होत असेल, तर त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई केली जाईल. यापूर्वीही लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

सत्ता नसल्याने फडणवीसांना नैराश्‍य

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्ता नसल्याने नैराश्‍य आलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलून आपण आपला वेळ वाया घालवणार नसल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. विरोधकांना बोलण्यासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. त्यांना उत्तर देण्याऐवजी राज्यात काही विकासकामे केलेली बरी. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक सुरू आहे आणि हे इकडे टीका करत बसले आहेत. त्या निवडणुकीवरील लक्ष विचलित करण्यासाठी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष वाट्टेल ते आरोप करीत आहेत. आम्ही खालच्या पातळीवर जाणार नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com