सेनापती कापशी (कोल्हापूर) : झुलपेवाडी येथील चिकोत्रा मध्यम प्रकल्प कधी भरतो याकडे चिकोत्रा खोऱ्यातील सुमारे 32 गावांचे डोळे लागून राहिलेले असतात. तीन आठवडे पावसाने ओढ दिल्याने येथील शेतकरी चिंतेत होते. आज प्रकल्प भरल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. प्रकल्पात आता 97.77 टक्के साठा झाला असून आज पासून 100 क्यूसेकने वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
या प्रकल्पाने 20 जुलै रोजी अर्धा पल्ला गाठला आणि पावसाने दडी मारली. आजरा, भुदरगड तालुक्यातील शेतीसह कागल तालुक्यातील पिण्याच्या पाणी योजना आणि शेती मोठ्या प्रमाणात या प्रकल्पावर अवलंबून आहे. यामुळे 32 गावे चिंतेत होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने प्रकल्प 97.77 टक्के भरलाआणि चिकोत्रा खोरे चिंता मुक्त झाले. प्रकल्प भरल्याने आज दुपारी बारा वाजल्यापासून वीज निर्मिती केंद्रातून 100 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे चिकोत्रा नदीला पाण्याची पातळी वाढणार आहे.
चिकोत्रा प्रकल्पात 2000 सालापासून पाणी साठा होत आहे. या 20 वर्षाच्या इतिहासात 2005, 2007, 2012, 2018, 2019, 2020 असा सहा वेळा पूर्ण क्षमतेने प्रकल्प भरला. आज पाण्याची पातळी 687 मीटर इतकी आहे. यावर्षी येथे 1773 मि. मि. पाऊस झाला. शाखा अभियंता दिग्विजय कुंभार, एम. के. चव्हाण आणि त्यांचे सहकारी प्रकल्पात साठणाऱ्या पाण्यावर आणि होणाऱ्या विसर्गावर लक्ष ठेवून आहेत. विसर्गामुळे चिकोत्रा नदीच्या पाण्यात आणखी वाढ होणार आहे.
नदी काठावरच्या शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यावेळी अभियंता दिग्विजय कुंभार, एम. के. चव्हाण, सुरेश एकल, अमोल खांडेकर, सुनील पाडेकर, किरण पावले उपस्थित होते. दरम्यान, येथे अधीक्षक अभियंता एम. व्ही. सुर्वे आणि कार्यकारी अभियंता एस. सी. माने यांनीही भेट दिली.
हे पण वाचा - काँग्रेसच्या आणखी एका आमदारांना कोरोनाची लागण
संपादन- धनाजी सुर्वे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.