कोल्हापूर ः शहरातील अनेक मुख्य भागांसह गल्लीबोळातही ‘वळणावरच पार्किंग’चे चित्र पाहावयास मिळत आहे. अशा बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडीबरोबर अपघाताचे धोकेही निर्माण होऊ लागले आहेत.
शहर दिवसेंदिवस विस्तारत आहे, तशी लोकसंख्याही वाढत आहे. वाहनांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र, त्या तुलनेत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. शहरातील मुख्य भागातील अनेक इमारती, व्यापारी संकुलांत पार्किंगचा अभाव आहे. परिणामी या ठिकाणची वाहने थेट रस्त्याच्या कडेलाच पार्क होत आहेत. सध्या शहरातील अनेक मध्यवर्ती ठिकाणांसह गल्लीबोळातही थेट वळणावरच वाहने पार्किंग हे नित्याचेच बनू लागले आहे. वळणावरच वाहने पार्किंग केल्याने रस्त्यावरील अन्य वाहनांचा सहज अंदाज येत नाही. अशा वळणावरून वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अशा बेशिस्त पार्किंगमुळे छोट्या-छोट्या गल्लीबोळातही वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. यातून घडणारे छोटे-मोठे अपघात सर्वसामान्यांच्या चिंतेत भर टाकत आहेत. पालक मुलांच्या हातात गाडीची चावी देताना वाहतूक नियमांच्या पालन करण्याबरोबर वळणावरच केलेल्या पार्किंगकडेही लक्ष देऊन गाडी चालव, असा आवर्जून सल्ला देऊ लागलेत.
दृष्टिक्षेपात...
शहरातील रस्ते- ८९४.९२ कि.मी.
मिळकती- १,५०,०००
सिग्नल- ३४
एकेरी मार्ग- २९
जिल्ह्यातील वाहनांची संख्या- १५ लाख ४६ हजार
हे अपेक्षित...
वळणावरील पार्किंगवर सक्षम कारवाई करा
कारवाईत सातत्य ठेवा
गल्लीबोळातही मोहीम राबवा
पार्किंगसाठी पर्याय उपलब्ध करा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.