इचलकरंजी : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची दिशा दिवसेंदिवस भरकटत आहे. ज्या स्फूर्तीने स्पर्धा परीक्षेच्या जगात प्रवेश केला जातो, ती कायम टिकत नाही. विद्यार्थी निराशेच्या गर्तेत अडकत आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी मैदानी खेळ, योगासने, मनोरंजनाचा अवलंब करूनही स्पर्धेत विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत आहे. स्पर्धा परीक्षा हा एकच पर्याय ठेवून सुमारे ५२ टक्के विद्यार्थ्यांच्या मतानुसार सरकारने शासकीय रिक्त पदे भरावीत, असा निष्कर्ष समोर आला आहे. सायबर महाविद्यालयाचा समाजकार्य विभागाचा विद्यार्थी महेंद्र जनवाडे याने ‘स्पर्धा परीक्षार्थींना भेडसावणारी आव्हाने व आकांक्षा’ याचा अभ्यास करून विशेष संशोधन केले आहे.
महेंद्र जनवाडे याने प्रा. डॉ. दीपक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा सामाजिक-लोकसंख्याशास्त्रविषयक अभ्यास केला. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना उद्भवणाऱ्या आरोग्य, मानसिक, आर्थिक व वैयक्तिक पातळीवरील अडचणी जाणून घेतल्या. स्पर्धा परीक्षा केंद्रातील नोंदणीकृत २५ विद्यार्थ्यांची निवड केली. प्रत्यक्ष संवाद साधून प्रश्नावलीद्वारे विद्यार्थ्यांची मते घेतली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांच्या मूळ जगण्याचा सखोल अभ्यास संशोधनाद्वारे केला.
सर्वाधिक ७० टक्के विद्यार्थी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करतात. पाठोपाठ बँकिंग, पीएसआय, एसएससी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. ६० टक्के विद्यार्थी ग्रामीण, तर ४० टक्के शहरी भागातील आहेत. सलग तीन ते चार वर्षे अभ्यास करणाऱ्यांचे प्रमाण तब्बल ८० टक्के आहे. रोज चार ते आठ तास अभ्यास करणारे ६४ टक्के, ८ ते १२ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १६ टक्के आहे. १६ टक्के विद्यार्थी पार्टटाईम जॉब करतात. ८४ टक्के विद्यार्थी दिवसरात्र अभ्यासातच मग्न असतात. यासह विविध मुद्यांच्या अनुषंगाने संशोधनातून ठळक निष्कर्ष समोर आला आहे.
प्रमुख निष्कर्ष
२१ ते २५ वयोगटातील विद्यार्थी ६८ टक्के
सुमारे ६० टक्के विद्यार्थी तणावाखाली
एकाच ठिकाणी अभ्यासासाठी बसल्याने आरोग्याच्या तक्रारी
नवोदित विद्यार्थ्यांसमोर बी प्लॅन नाही
तीन वेळा परीक्षा दिलेले ६० टक्के विद्यार्थी
विद्यार्थ्यांसमोरील पर्याय
स्पर्धा परीक्षांबरोबर अन्य पर्याय असावा
पदवीपूर्वपासूनच परीक्षेची तयारी करावी
अभ्यासासाठी ठोस कृती हवी
तणावमुक्त राहण्यासाठी मानसतज्ज्ञांचे मार्गदर्शन
अभ्यासाबरोबर मुक्त विद्यापीठातून शिक्षण घ्यावे
ताणतणावाची प्रमुख कारणे
कारणे विद्यार्थी (टक्के)
परीक्षेची भीती १६
स्पर्धा ६०
कौटुंबिक ताण १२
परीक्षेची अनिश्चितता १२
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.