कोवाड ते कालकुंद्रीपर्यंतचे पात्र कोरडे

The River Basin From Kowad To Kalkundri Is Dry Kolhapur Marathi News
The River Basin From Kowad To Kalkundri Is Dry Kolhapur Marathi News

कोवाड : येथील ताम्रपर्णी नदीतील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम गतीने सुरू आहे. बांधकामाला पाण्याचा अडथळा होऊ नये म्हणून नवीन पुलाशेजारी मातीचा बांध घालून पाणी अडविले. त्यामुळे बंधाऱ्याचे खालचे पात्र कोरडे पडले आहे. कोवाड ते कालकुंद्रीपर्यंतच्या नदीपात्रात पाणी नसल्याने कृषिपंप उघडे पडले आहेत. नदीपात्रात पाणी नसल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने कोवाड बंधाऱ्याचे बांधकाम होईपर्यंत किटवाड धरणातून नदीला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

कोवाड व कामेवाडी हे दोन्ही बंधारे 50 वर्षांपूर्वी बांधलेले आहेत. अलीकडे जड मालाच्या वाहनांची ये-जा सुरू झाल्याने बंधाऱ्यांना धोका पोचला आहे. कमानींचे दगड ढासळणे, ठिकठिकाणी भिंतींना भगदाडे पडणे असे प्रकार झाल्याने कोवाड बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नामुळे यावर्षी कोवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 40 लाखांचा निधी मंजूर झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून बंधाऱ्याच्या बांधकामाला सुरवात झाली आहे.

नदीतील पाण्याचा अडथळा होऊ नये व बांधकाम वेगाने व्हावे म्हणून नवीन पुलाच्या शेजारी मातीचा बांध घालून पाणी अडविले आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या खालचे नदीपात्र उघडे पडले. उन्हाळा असल्याने पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे असलेले पाणी संपल्याने नदीपात्र कोरडे पडले. कोवाडपासून कालकुंद्री, कागणी व दुंडगे येथील शेतकऱ्यांचे शेकडो कृषिपंप नदीवर आहेत.

पाणी नसल्याने हे कृषिपंप उघडे पडले आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गहन झाला आहे. कडक उन्हात पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे अडविलेले पाणी खाली सोडले तर बांधकाम थांबू शकते. त्यासाठी किटवाड धरणातून नदीला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचा हा प्रश्‍न सुटणार आहे. पाटबंधारे विभागाने तत्काळ किटवाड बंधाऱ्यातील पाणी सोडून शेतकऱ्यांची पाण्याची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे. 

कृषिपंप उघडे

कोवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने नदीपात्रातील पाणी अडविले आहे. पण, बंधाऱ्याच्या खालील पात्रात पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे कृषिपंप उघडे पडले आहेत. शेतीला पाण्याची गरज असल्याने पाटबंधारे विभागाने किटवाड धरणातील पाणी सोडल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. 
- शिवाजी जाधव, शेतकरी, कोवाड 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com