चंदगडच्या शेतकऱ्यांना बारा वर्षानंतर न्याय मिळणार?

चंदगडच्या शेतकऱ्यांना बारा वर्षानंतर न्याय मिळणार?

चंदगडच्या शेतकऱ्यांना बारा वर्षानंतर न्याय मिळणार?
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः दौलत कारखाना २०१०-११ मध्ये चालवायला घेतलेल्या तासगावकर शुगर्सची ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची पन्नास टक्के थकीत बिले मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तसे संकेत मिळाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याची सुचना केली आहे. आजच्या बैठकीत अॅड. संतोष मळवीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडल्यावर चार दिवसांत निर्णय देण्याचे रेखावार यांनी स्पष्ट केले.
तासगावकर शुगर्सकडून वेळेत बिले अदा न केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादीत सर्व साखर जप्त केली. ती विक्री करुन ५२ कोटी रुपये आले होते. त्यापैकी त्यावेळच्या एफआरपीच्या पन्नास टक्के ७२३ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले. उर्वरीत २७ कोटी ६० लाख रुपये शासकीय तिजोरीत जमा होते. दरम्यान कारखान्याला अर्थ पुरवठा करणाऱ्या बेळगाव येथील नवहिंद क्रेडीट सोसायटी व सह्याद्री सोसायटीकडून आपली रक्कम प्राधान्याने मिळावी यासाठी न्यायालयात दावा केला. या दोन संस्थांनी मिळून १९ कोटी २० लाख रुपये कारखान्याला कर्ज दिले होते. शेतकऱ्यांची उर्वरीत रक्कम १८ कोटी १६ लाख रुपये होती. २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने निकाल देताना प्रथम नवहिंद, सह्याद्री संस्था त्यानंतर शेतकरी व कामगार यांची देणी द्यावी, असे स्पष्ट केले. त्यावर या संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तेथेही उच्च न्यायालयाचाच निकाल कायम केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पतपुरवठा केलेल्या दोन्ही संस्थेच्या प्रतिनिधींना बोलावून घेतले होते. याची कुणकुण लागताच अॅड. मळवीकर यांनी शेतकऱ्यांच्या वतीने वकीलपत्र घातले. यामध्ये शेतकऱ्यांना डावलले जाऊ नये, अशी मागणी केली. त्यानुसार आज त्यांच्यासह गड्यान्नावर यांनीही बाजू मांडली. यावर चार दिवसांत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारा वर्षानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळणार असल्याचे संकेत मिळाले. या वेळी प्रा. दीपक पाटील, तानाजी गडकरी, शिवानंद हुंबरवाडी, एस. एल. पाटील, भिकू गावडे, दौलत कारखान्याचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यकारी संचालक मनोहर होसूरकर उपस्थित होते.
-------------
शासकीय देणेकऱ्यांचा गोतावळा
बारा वर्षापूर्वी तिजोरीत जमा केलेल्या २७ कोटी ६० रुपयांचे व्याजासह ५७ कोटी ९४ लाख रुपये झाले आहेत. एवढी मोठ्ठी रक्कम पाहून शासकीय अधिकारीही आज आपला हक्क सांगण्यासाठी आले होते. त्यांनी म्हणणे मांडताच तानाजी गडकरी संतापले. शेतकऱ्याला चार पैसे मिळतात म्हटले की अधिकारी सरसावतात, इतकी वर्षे ही थकीत रक्कम मिळावी म्हणून त्यांनी काय केले असा प्रश्न केला. अशी कोणतीही रक्कम शेतकऱ्यांकडून कपात करु नये, असे ठणकावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com